बेळगाव : पुढारी वृत्तसेवा पदवीधर मतदार संघातून काँग्रेस उमेदवार सुनील संक यांनी 10 हजार मते घेतली आहेत. त्यांचा पराभव झाला आहे. शेवटच्याक्षणी तिकीट वाटपाच्या गोंधळामुळे सुनील संक यांचा पराभव झाला असल्याचे आ. जारकीहोळी यांनी सांगितले.
येथील काँग्रेस भवनमध्ये पत्रकारांशी ते बोलत होते. काँग्रेसमध्ये कोणतेच गट-तट नाहीत. सर्वजण एकत्र आहेत. वैयक्तीक विचार वेगळे असले तरी सर्वजण निवडणुकीदरम्यान एकत्र येतात. यामुळेच शिक्षक मतदार संघातून प्रकाश हुक्केरी यांना विजयी करणे शक्य झाले आहे, असे आ. जारकीहोळी यांनी सांगितले.
राहुल गांधी, सोनिया गांधी यांना उद्देशपूर्वक ईडीकडून समन्स देऊन त्रास देण्यात येत आहे. याला कायद्यानेच उत्तर देऊ, असे त्यांनी सांगितले. 2023 च्या निवडणुकांची तयारी आतापासूनच करण्यात येत आहे. प्रकाश हुक्केरी यांच्या विजयामुळे काँग्रेस पक्षाला बळ मिळाला आहे. बेळगावमध्ये तडजोडीचे राजकारण नाही. काही सभा समारंभांमध्ये सर्व राजकीय नेते एकत्र येतात. ही न टाळता येणारी बाब आहे, असे ही त्यांनी सांगितले. हुक्केरी यांनी मतमोजणीदरम्यान पोलिस अधिकार्यांबाबत केलेले वक्तव्य गैर होते. यापुढे असे होणार नाही, असेही केपीसीसी कार्याध्यक्ष आ. सतीश जारकीहोळी यांनी सांगितले. यावेळी ग्रामीण काँग्रेस जिल्हा अध्यक्ष विनय नावलगट्टी, केपीसीसी कार्यदर्शी सुनील हणमण्णावर उपस्थित होते.