बेळगाव

कर्नाटक विधानसभा निवडणूक : मतदान चक्क रात्री ९ पर्यंत

दिनेश चोरगे

बेळगाव; पुढारी वृत्तसेवा :  विधानसभा निवडणुकीसाठी मतदानाची निर्धारित वेळ सकाळी ७ ते सायंकाळी ६ ही होती. मात्र शेवटचे मतदान बुधवारी रात्री ९ वाजता झाले. ते मतदान केंद्र होते खानापूर तालुक्यातील करंबळ हे दिवसभर कडक उन्ह त्यानंतर सायंकाळी सुरु झालेला पाऊस यामुळे खानापूर तालुक्यात रात्री नऊपर्यंत मतदान सुरु राहिले. करंबळ गावामध्ये सायंकाळी चार वाजता जोरदार पावसाला सुरुवात झाली. पाच वाजता पाऊस पाऊस थांबला. त्यानंतर एकाचवेळी सर्व शिल्लक मतदार मतदान केंद्राच्या आवारात आले. त्यामुळे त्यांना चिट्ट्या (टोकन) देण्यात आल्या. या केंद्रावर रात्री ९ वा. मतदान प्रक्रिया पूर्ण झाली. याबरोबर खानापूर येथील उर्दू शाळा आणि कौंदल गावातही रात्री साडे आठवाजेपर्यंत मतदान सुरु राहिले.

दरम्यान, अनेक ठिकाणी चाललेली उशीरापर्यंतचे मतदान, बेळगावहून सर्वाधिक लांब असणाऱ्या अथणी मतदार संघातील ईव्हीएम आणि मतदानाचे साहित्य तब्बल पंधरा तास उशिरा म्हणजे गुरुवारी सकाळी ९ वाजत आरपीडी महाविद्यालयात दाखल झाली परिणामी जिल्हाधिकारी नितेश पाटील यांच्यासह निवडणूक आणि सहाय्यक निवडणूक अधिकारी असलेल्या ४० अधिकाऱ्यांना अविरत सलग ३६ तास सेवा द्यावी लागली.

मतदानानंतर प्रत्येक तालुक्यातील मतदान यंत्रे तालुक्याच्या मुख्यालयात संग्रहित करण्यात आली. त्यानंतर पोलिस बंदोबस्तात ही यंत्रे येथील आरपीडी महाविद्यालयात आणण्यात आली. रात्री उशीरार्यंत संपूर्ण जिल्ह्याभरातून मतदान यंत्रे येत होती. गुरुवारी सकाळी ९ वाजता शेवटची मतदान यंत्रे अथणीची आली

मतदान यंत्रे दिवसभर स्ट्रॉगमध्ये ठेऊन त्याची नोंदणी करण्यात आली. स्ट्राँगरुमध्ये ठेवण्यात आलेल्या रुमला संबंधित अधिकाऱ्याच्या सहीने सील करण्यात आले. जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः हे सील तपासले.

SCROLL FOR NEXT