अंकली : जगभरात सध्या सर्व क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा मोठ्याप्रमाणात वापर होत आहे. तरीही या युगात आपल्या भारतीय संस्कृतीला अधिक महत्त्व आहे. आपल्या चालीरीती, रूढी-परंपरा, यात्रा, महोत्सव वधार्मिक स्थळांमुळेच आपली संस्कृती टिकून आहे. संस्कृतीचे जतन करण्यासाठी युवापिढी सुदृढ बनली पाहिजे. आत्मनिर्भर भारत निर्माण करण्यासाठी सर्व मानवजातीने दया, धर्म संदेश, संस्कृती याचा वापर करून आत्मविश्वास वाढवणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांनी केले.
येडूर (ता. चिकोडी) येथे सुरू असलेल्या राजगोपूर लोकार्पण, कृष्णारती, लक्षदीपोत्सव व महाकुंभाभिषेक कार्यक्रमात ते बोलत होते. उपराष्ट्रपती राधाकृष्णन म्हणाले, प्राचीन व इतिहास काळापासून आपल्या भारतीय देशाला साधू-संत महात्म्यांचे योगदान लाभले आहे. त्यामुळेच आपली भारतीय संस्कृती टिकून आहे.
कर्नाटक व महाराष्ट्र राज्यात वीरशैव समाज मोठ्याप्रमाणात आहे. या सर्व समाजासाठी आपल्या देशभरात त्यांनी चालवलेल्या मठ व धार्मिक केंद्रातून अनेक विद्यार्थ्यांना वेद, संस्कृत व वैचारिक अध्यात्म याचे प्रशिक्षण देऊन समाजात सुसंस्कृत समाज निर्माण करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न होत आहेत. त्यासाठी मठाधीशांचे कार्य कौतुकास्पद आहे.
येडूर क्षेत्राला मी पहिल्यांदाच भेट देत असून याठिकाणी असलेल्या सर्व परिसराची माहिती घेतली. पूर्वीपासून असलेल्या या प्रसिद्ध येडूर क्षेत्राच्या विकासासाठी स्वामींचे योगदान मोठ्याप्रमाणात आहे. परिसरातील महिलांना आत्मनिर्भय व स्वावलंबी बनवण्यासाठी स्वतः बनवलेले चांदीचा रथ महोत्सव, विविध धार्मिक कार्य हे महिलांसाठी उपयुक्त आहे. महिलांना अधिक महत्त्व देऊन त्यांचा सन्मान केल्याचे कौतुकास्पद आहे.
येडूर क्षेत्र एक अध्यात्मक व धार्मिक केंद्र म्हणून प्रसिद्ध आहे. याठिकाणी झालेले पौराणिक काळात महायज्ञ व धार्मिक कार्यामुळे याठिकाणी येणाऱ्या भाविकांना योग्य सेवा देण्यासाठी श्रीशैल पिठाचे जगद्गुरु व येडूर येथील काळसिद्धेश्वर संस्थान मठाचे आणि वीरभद्र देवस्थानाचे धर्माधिकारी डॉ चन्नपंडिताराध्या शिवाचार्य महास्वामींचे कार्य लाखमोलाचे आहे. आध्यात्मिक केंद्रातून आपली भारतीय संस्कृती व वेद टिकवण्याचे कार्य सुरू असल्याचेही उपराष्ट्रपती राधाकृष्णन यांनी सांगितले.