निपाणी : डोंगराळ भागातील पाणीटंचाई दूर करून स्थानिक स्तरावर रोजगारनिर्मिती वाढविण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत, असा विश्वास सहकाररत्न उत्तम पाटील यांनी व्यक्त केला. शेंडूर व गोंदूकुप्पी परिसरातील कार्यकर्ते आणि नागरिकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात (शरदचंद्र पवार गट) प्रवेश केल्याच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
प्रारंभी उत्तम पाटील व मान्यवरांच्या हस्ते रोपाला पाणी घालून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. पर्यावरण संवर्धन आणि विकासाचा संदेश देत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. पाटील म्हणाले, मी निवडणुकीपुरते राजकारण करत नाही तर वर्षभर समाजसेवा करण्यावर माझा विश्वास आहे. त्यामुळेच सर्वसामान्य नागरिक आमच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत. डोंगराळ भागातील शेंडूर, गोंदूकुप्पी परिसरात पाणीप्रश्न गंभीर असून शेती व रोजगाराच्या मर्यादित संधींमुळे युवकांचे स्थलांतर वाढत आहे. ही परिस्थिती बदलण्यासाठी स्थानिक पातळीवर उद्योग, स्वयंरोजगार योजना आणि महिला बचतगटांच्या माध्यमातून आर्थिक सक्षमीकरणावर भर देण्यात येणार आहे.
महिलांच्या विकासात्मक धोरणांवर विशेष काम सुरू असून गावागावांत विकास पोहोचविण्याचा संकल्प करण्यात आला आहे. कार्यकर्ता हाच माझा खरा पक्ष आहे. माझ्यावर विश्वास ठेवून येणाऱ्या प्रत्येकाच्या पाठीशी मी ठामपणे उभा आहे. तुमच्या प्रत्येक अडचणीत आणि संकटात मी पावलाला पाऊल देऊन सोबत राहीन, अशी ग्वाही देत त्यांनी कार्यकर्त्यांना संघटित राहण्याचे आवाहन केले. व्यासपीठावरील मान्यवरांनीही मनोगत व्यक्त करत उत्तम पाटील यांच्याशी एकनिष्ठ राहण्याची प्रतिज्ञा घेतली. पक्षप्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमास पुंडलिक कुंभार, अण्णाप्पा वरुटे, बाबासाहेब पाटील, युवराज धोंडफोडे, पांडुरंग शिंदे, पप्पू मांगोरे, शिवाजी लाड, भरत ढोकरे, अर्जुन नाईक, भीमराव नाईक, सुनील नाईक, गणपती नाईक, सुनील तोंदले, मलगोंडा माने, संदीप पाटील, जयदीप भाट, अमृत शेवाळे आदींसह शेंडूर व गोंदूकुप्पी परिसरातील कार्यकर्ते, पदाधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते.