Tavandi Ghat Pudhari
बेळगाव

Tavandi Ghat: तवंदी घाट अन् मृत्‍यूची वाट

अतिउंच गतिरोधक धोकादायक : रंग, रिफ्लेक्टर नसल्याने जणू बनलेत काळ

पुढारी वृत्तसेवा
मधुकर पाटील

निपाणी : पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गाच्या सहापदरीकरणाचे काम स्तवनिधी घाट ते कोगनोळी या टप्प्यात एस. एम. अवताडे कंपनीकडून सुरू आहे. तवंदी घाटातील वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. अपुरे नियोजन, अतिउंच गतिरोधक, धोकादायक उतार आणि सुरक्षा व्यवस्थेचा अभाव यामुळे हा घाट वाहनचालकांसाठी मृत्यूची वाट ठरत आहे. सोमवारी रात्री झालेल्या भीषण अपघातात कोल्हापूरच्या दोन मेडिकल रिप्रेझेंटेटिव्हचा जागीच मृत्यू झाल्यानंतर या प्रश्‍न पुन्‍हा ऐरणीवर आला आहे.

सहापदरीकरणाचे काम सुरू असल्याने बेळगाव-कोल्हापूर मार्गावरील वाहतूक सर्व्हिस रोड व तात्पुरत्या मार्गावरून सुरू आहे. तवंदी घाटातील उड्डाणपुलाचे काम अंतिम टप्प्यात असल्याने एका बाजूची वाहतूक डोंगर फोडून तयार केलेल्या मार्गावरून बेळगाकडे वळविण्यात आली आहे. हा मार्ग अरुंद, तीव्र उताराचा आहे. सहा किलोमीटरच्या पट्ट्यात तब्बल दहा ते बारा गतिरोधक उभारण्यात आले आहेत. पैकी अनेक गतिरोधकांची उंची प्रमाणापेक्षा जास्त असल्याचा आरोप वाहनचालकांकडून होत आहे.

रात्रीच्या वेळी स्पीडब्रेकर सहजासहजी दिसत नाहीत. अनेक स्पीडब्रेकरवर रंग नाही, रिफ्लेक्टर नाहीत. वेगमर्यादेचे फलक, धोक्याच्या सूचना, प्रकाशयोजना आणि प्रभावी वाहतूक नियंत्रणाचा अभाव असल्याचेही वाहनचालक सांगतात.

SCROLL FOR NEXT