बेळगाव ः पुढारी वृत्तसेवा
हलगा-मच्छे बायपाससाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून पुन्हा प्रयत्न केले जात असून सोमवारी (दि. 7) रस्त्यासाठी यंत्रणा आणून ठेवली आहे. या प्रकारामुळे शेतकर्यांत संताप व्यक्त होत आहे.बायपासला आजपर्यंत शेतकर्यांचा कडाडून विरोध होत असून उच्च न्यायालयाने झिरो पॉईंट निश्चित झाल्याशिवाय बायपासमधील शेतकर्यांच्या शेतीचे, पिकांचे कोणतेही नुकसान करु नये, अशी सक्त ताकीद दिली आहे. तरीही तो आदेश पायदळी तुडवत प्रशासन, महामार्ग प्राधिकरण खाते आणि ठेकेदारांनी पोलिस प्रशासनाला हाताशी धरून शेतकर्यांचे आंदोलन मोडीत काढत बायपासची निर्मिती करण्याचा अट्टाहास कायम ठेवला आहे.
बायपासचे काम पुन्हा सुरू करण्याची तयारी चालवली असून हलगा येथे ठेकेदारने कांही यंत्रसामुग्री आणून उभी केली आहे.बायपाससंबधी दावे न्यायालयात सुरुच आहेत. तरीही रस्त्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे शेतकर्यांत संताप व्यक्त करण्यात येत आहे. प्रशासनाच्या या प्रकाराविरोधात शेतकरी पुन्हा आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत.