बेळगाव : उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार तीन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यानंतर बंगळूरला परतताच, सार्वजनिक बांधकाम तथा जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी सोमवारी दिल्लीत पोहोचले आहेत. त्यांनी राज्याचे काँग्रेस प्रभारी रणदीपसिंग सूरजेवाला यांची भेट घेतली. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचीही ते भेट घेणार आहेत. नेतृत्वबदल न करता फक्त मंत्रिमंडळ विस्तार करावा, अशी त्यांची मागणी असण्याची शक्यता आहे.
पाच राज्यांच्या निवडणुकांच्या निकालानंतर मे महिन्यात राज्यात मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याचा शब्द हायकमांडने दिला आहे. याच दरम्यान राज्यातील नेतृत्व बदलण्याचाही कयास आहे. त्या पार्श्वभूमीवर मंत्री जारकिहोळी यांची दिल्ली भेट महत्त्वाची मानली जात आहे. दिल्लीमध्ये जारकीहोळी यांनी सूरजेवाला यांची भेट घेतली. नेतृत्वबदल केला जाऊ नये, असा त्यांचा आग्रह असू शकतो. जारकीहोळी हे सिद्धरामय्या गटातील असून, सिद्धरामय्यांनीच मुख्यमंत्रिपदाची पाच वर्षे पूर्ण करावीत, असा या गटाचा आग्रह आहे. जारकीहोळी राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचीही भेट घेणार असल्याचे समजते.
राज्यात मंत्रिमंडळ विस्तार आणि प्रदेश काँग्रेस अध्यक्षांच्या निवडीबाबत चर्चा सुरू असतानाच, जारकीहोळी यांच्या दिल्ली भेटीला अचानक विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. सतीश जारकीहोळी यांच्या पाठोपाठ मंत्री एच.सी. महादेवप्पा हेदेखील आज रात्री दिल्लीत दाखल होणार आहेत. महादेवाप्पा हेही सिद्धू गटातील नेते आहेत. ही भेट केवळ प्रशासकीय कामासाठी आहे की, राज्यातील नेतृत्वातील बदलाबाबतच्या चर्चेसाठी आहे, याविषयी राजकीय वर्तुळात विविध तर्कवितर्क लढवले जात आहेत.