बेळगाव : पुढारी वृत्तसेवा
गत काही दिवसापासून विश्रांती घेतलेल्या परतीच्या पावसाने शनिवारी सायंकाळी कुद्रेमाणी, शिनोळी खुर्द परिसराला झोडपून काढले. शिनोळी खुर्द येथील एका खाजगी कंपनीच्या पर्जन्यमापन केंद्रानुसार 35 मिनिटांमध्ये 44 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. कमी वेळेत सर्वाधिक पाऊस पडला. यामुळे विविध पिकांच्या नुकसानीचा फटका सहन करावा लागणार आहे.
सध्या भात पिके पोसवणीला आली आहेत. अशावेळी पावसाची गरज आहे, मात्र गत काही दिवसापासून लांबलेल्या पावसाने शनिवारी झोडपून काढले. यामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले. सायंकाळी 4:30 वाजता सुरू झालेला पाऊस 6 वाजेपर्यंत सुरूच होता. अचानक आलेल्या मुसळधार पावसामुळे सर्वांची तारांबळ उडाली. काही दिवस पाऊस नसल्याने अनेक जण छत्री रेनकोट शिवाय प्रवास करत होते. तर बाजारपेठ तसेच अन्य ठिकाणी गेलेल्या नागरिकांना पावसामुळे भिजून घरी जावे लागले. सध्या सोयाबीन काढणे तसेच अनेक काही कडधान्य पीक काढण्याचे कामे गतीने सुरू आहेत.
अशावेळी अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांनाही फटका बसला. काही ठिकाणी मुसळधार पावसामुळे भात पीक आडवे झाल्याने भात पिकाच्या नुकसानीचाही फटका बसणार आहे. गत काही दिवसापासून हवेत प्रचंड उष्मा जाणवत होता, मात्र शनिवारी सायंकाळी परतीच्या पावसामुळे उष्म्यापासून नागरिकांना दिलासा मिळाला. काही दिवसापासून वातावरणात बदल झाला आहे आणि आता या पावसामुळे हवेत गारठा पसरला आहे.