बेळगाव ः पुढारी वृत्तसेवा
बेळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी (बीडीसीसी) बँकेच्या प्रशासनातील राजकीय दबावामुळे आपण तत्काळ अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याचे रमेश कत्ती यांनी बेल्लद बागेवाडी येथे पत्रकार परिषदेत सांगितले.बीडीसीसी बँकेसोबतच्या 42 वर्षांच्या संबंधात अशी परिस्थिती आली नव्हती. पण, आता सहन करता येत नसल्यामुळे बँकेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले. माझ्या विरोधात कोणत्याही संचालकांनी काम केलेले नाही. पक्षाचा विचार न करता सर्वांनी सहकार्य केल्याचे ते म्हणाले.
मी 27 वर्षे अध्यक्ष म्हणून काम केले आहे. मी 60 वर्षांचा असल्यामुळे मी राजीनामा दिला. बीडीसीसी बँक मजबूत आहे. ग्राहक-सदस्यांनी कोणत्याही अफवांवर लक्ष देऊ नये. गुंतवलेल्या ठेवी काढू नयेत, अशी विनंती त्यांनी केली.सर्व संचालक एकत्र असून सर्वांशी चर्चा करून नवोदितांना संधी देण्यासाठी मी राजीनामा दिला आहे. जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते आ. प्रकाश हुक्केरी, माजी खा. डॉ. प्रभाकर कोरे, पालकमंत्री सतीश जारकीहोळी, आमदार लक्ष्मण सवदी, आमदार रमेश जारकीहोळी, आमदार भालचंद्र जारकीहोळी व त्यांच्यासह सर्व संचालकांच्या सर्वानुमते लवकरच नवीन अध्यक्षाची निवड करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. यावेळी अप्पासाहेब शिरकोळी, राजेंद्र पाटील, बसवराज मरडी, अशोक पट्टणशेट्टी, पृथ्वी कत्ती, पवन कत्ती, जयगौडा पाटील, सत्यप्पा नाईक, ए.के. पाटील, राजू मुन्नोळी, राचैय्या हिरेमठ, गुरुराज कुलकर्णी, रवींद्र बल्ली, रवींद्र बल्ले, रामण्णा गोतुरे, राजू पाटील, गिरीश पाटील आदी उपस्थित होते.
मुडा घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर विरोधक मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या राजीनाम्याची मागणी करत असतानाच भाजपचे माजी खासदार रमेश कत्ती यांनी सिद्धरामय्या यांचे स्वच्छ आणि कार्यक्षम प्रशासक म्हणून कौतुक करत वेगळी भूमिका घेतली आहे. सिद्धरामय्या यांच्यावर घोटाळा झाला आहे. आजचे राजकारण खूप बदलले आहे. येडियुराप्पा आणि कुमारस्वामी यांनाही कलंकित केले आहे. आमचा सर्व पक्षांशी संबंध आहे. राजकारणात आजची स्थिती चांगली नाही. पुढील राजकीय निर्णयाबाबत ज्येष्ठांशी चर्चा करून पुढील धोरण ठरवू. राजकारणात असो वा नसो, जनतेसोबत असल्याचे ते म्हणाले.