RCB Victory Parade Bengaluru Stampede
बेंगळुरू : रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने मंगळवारी झालेल्या आयपीएलच्या थरारक अंतिम सामन्यात पंजाब किंग्जचा ६ धावांनी पराभव करून इतिहास रचला. दरम्यान, आरसीबी संघाच्या विजयी मिरवणुकीला बुधवारी चेंगराचेंगरीचे गालबोट लागले. गुरुवारी बेंगळुरुमधील चिन्नास्वामी स्टेडियममध्ये होणाऱ्या आरसीबीच्या विजयी मिरवणुकीच्याआधी स्टेडियम बाहेर चाहत्यांची मोठी गर्दी जमली होती. ही गर्दी नियंत्रणाबाहेर गेली आणि चेंगराचेंगरी झाली. या चेंगराचेंगरीत १० जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. तर २४ जण जखमी झाले आहेत.
गुरुवारी आयपीएल २०२५ चॅम्पियन रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूच्या विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी बंगळुरूमधील एम. चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर मोठ्या संख्येने चाहते जमले होते. यादरम्यान स्टेडियम बाहेर चेंगराचेंगरी झाली. काहींनी झाडांवरून आणि संरक्षक भिंतीवरुन आत जाण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान चेंगराचेंगरी झाली. यात दहा जणांचा मृत्यू झाला. तर २४ जण जखमी झाले आहेत. यात एका सहा वर्षांच्या मुलीचा समावेश आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
तब्बल १८ वर्षांनंतर रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने आयपीएलचे जेतेपद पटकावल्याने संघाचे समर्थक उत्साह संचारला आहे. चाहत्यांसोबत विजयाचं सेलिब्रेशन करण्यासाठी आरसीबीचा संघ बुधवारी संध्याकाळी बेंगळुरूतील एम. चिन्नास्वामी स्टेडियम येथे येणार होता. गेट नंबर तीन येथे गर्दी नियंत्रणाबाहेर गेली आणि चेंगराचेंगरीची परिस्थिती निर्माण झाली.
आरसीबी विजयी परेडची एक झलक पाहण्यासाठी अनेकजण झाडावर चढताना आणि फांद्यावर बसलेले दिसून आले. दरम्यान, मोठ्या गर्दी होण्याच्या शक्यतेने सुरक्षेच्या कारणास्तव कर्नाटक सरकारने आधीच विधान सौधा ते चिन्नास्वामी स्टेडियमपर्यंतची खुल्या बसमधून काढण्यात येणारी विजय परेड रद्द केली होती.
स्टेडियमबाहेर चाहत्यांची मोठी गर्दी झाली होती. यादरम्यान, हलका पाऊसही सुरू झाला. पावसामुळे लोक इकडे तिकडे धावू लागले. त्यानंतर चिन्नास्वामी स्टेडियमच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ चेंगराचेंगरी झाली. गर्दी नियंत्रणाबाहेर गेल्याने स्टेडियमबाहेर गोंधळ उडाला. गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना सौम्य बळाचा वापर करावा लागला. एएनआयने वृत्तसंस्थेने शेअर केलेल्या एक व्हिडिओत, पोलिस स्टेडियमच्या गेटजवळ गर्दी नियंत्रणात आणताना लाठीमार करताना दिसतात.
कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांनी, गर्दी नियंत्रणाबाहेर गेल्याने गोंधळ उडाल्याचे म्हटले आहे. "मोठी गर्दी झाल्याबद्दल मी माफी मागतो." आम्ही ५ हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांची व्यवस्था केली आहे. ही तरुणांची उत्साही गर्दी असून आम्ही त्यांच्यावर लाठीमार करू शकत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
"मी पोलिस आयुक्तांशी बोललो आहे. मी नंतर रुग्णालयातही जाणार आहे. मृतांची नेमकी संख्या आहे, हे आताच सागूं शकत नाही. आम्ही लोकांना शांत राहण्याचे आवाहन करत आहोत. आम्ही कमी वेळेत म्हणजे कार्यक्रम १० मिनिटांत आटोपला. आम्ही परिस्थिती सामान्य करण्याचा प्रयत्न करत आहोत. लाखो लोक आले. यामुळे गर्दी वाढली" असेही ते पुढे म्हणाले.