बेळगाव : राज्यातील राजकीय घडामोडींवर विरोधी पक्षाने शुक्रवारी (दि. 3) जोरदार हल्लाबोल केला. आम्ही कोणतेही ऑपरेशन कमळ राबवणार नाही. पण, नोव्हेंबरमध्ये राज्यात क्रांती होणार असून सिद्धरामय्या मुख्यमंत्री राहणार नाहीत, असा दावा केला. तर विधान परिषदेतील आमदार सी. टी. रवी यांनी एक भ्रष्ट जाऊन दुसरा भ्रष्ट व्यक्ती सत्तेवर आला तरी राज्याचे हित होणार नाही, असा आरोप केला.
भाजपचे नेते आज बेळगाव दौर्यावर असून त्यांनी पत्रकारांशी बोलताना सरकारवर जोरदार टीका केली. राज्यात निश्चितच नोव्हेंबर क्रांती होणार आहे. सिद्धरामय्या नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये माजी मुख्यमंत्री होतील. आता आम्ही फक्त निवडणुकांना सामोरे जाण्यासाठी वचनबद्ध आहोत. भाजप ऑपरेशन कमळ, युतीद्वारे सरकार स्थापन करण्याच्या प्रक्रियेत नाही, असे विरोधी पक्षनेते आर. अशोक यांनी सांगितले.
सिद्धरामय्या वारंवार आपणच पाच वर्षे मुख्यमंत्री राहणार असल्याचा दावा करत आहेत. परंतु, काही काँग्रेस आमदार विचारत आहेत की, तुम्ही कधी पायउतार होणार. त्यामुळे सिद्धरामय्या अधिक काळ मुख्यमंत्री राहणार नाहीत. मुख्यमंत्री बदलाचा करार झाला आहे हे खरे आहे. परंतु सिद्धरामय्या यांना दिलेले अधिकार सोडण्याचे धाडस नाही. दुसरीकडे, डी.के. शिवकुमार मुख्यमंत्रिपदासाठी आग्रही आहेत. त्यामुळे नोव्हेंबरनंतर मुख्यमंत्री बदल निश्चित आहे. भाजपच्या काळात कंत्राटदारांवर 40 टक्के कमिशनचा आरोप होता. ते सिद्ध झालेले नाही. आता कंत्राटदारांनी 80 टक्के कमिशनचा आरोप केला आहे. सिद्धरामय्या यांनी याचे उत्तर द्यावे, असे आर. अशोक म्हणाले.
विधान परिषदेचे सदस्य सी. टी. रवी यांनी काँग्रेस सरकारवर जोरदार हल्ला चढवला. ते म्हणाले, जर एक भ्रष्ट व्यक्ती निघून गेली आणि दुसरी भ्रष्ट व्यक्ती आली तर ते राज्यासाठी चांगले होणार नाही. बेळगाव, विजापूर, रायचूर, बिदर आणि गुलबर्गा येथे अतिवृष्टीमुळे नुकसान झाले आहे. या जिल्ह्यांतील शेतकरी अडचणीत आले आहेत आणि लाखो पिकांचे नुकसान झाले आहे. सरकार आणि मंत्र्यांची संवेदनशीलता गेली आहे. बेळगाव जिल्ह्यातील पालकमंत्र्यांना निवडणूक महत्वाची आहे. त्यांच्यात लोकांच्या समस्या ऐकण्याची संवेदनशीलता नाही.
सिद्धरामय्या म्हणतात की ते पुढील दोन वर्षे मुख्यमंत्री असतील. तुम्ही भ्रष्टाचारामुळे मुख्यमंत्री झालात. कंत्राटदारांनी पत्र लिहिले आणि ते वाचले, आता त्यांनी लिहिले की भ्रष्टाचार दुप्पट झाला आहे. भाववाढीमुळे सामान्य माणूस अडचणीत आहे. सध्याची परिस्थिती पाहिली तर मुख्यमंत्री बदलल्याने परिस्थिती सुधारणार नाही. सरकार बदलले तरच त्यात सुधारणा व्हायला हवी. सरकार आंधळे आणि बहिरे झाले आहे, असे ते म्हणाले.
मुख्यमंत्र्यांनी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे उद्घाटन करणे चुकीचे नाही, पण शेतकर्यांच्या समस्या सोडवण्याचे काम करा. काँग्रेस हायकमांड कमकुवत असल्याचे हे लक्षण आहे. सिद्धरामय्या यांनी हायकमांडचा पराभव केला आहे, असेही रवी म्हणाले. यावेळी आमदार शशिकला जोल्ले, खासदार इरण्णा कडाडी, आमदार विठ्ठल हलगेकर, माजी आ. महांतेश कवटगीमठ, धनंजय जाधव, मुरगेंद्रगौडा पाटील, गीता सुतार आदी उपस्थित होते.