बंगळूर : गेल्या काही महिन्यांपासून राज्यात सुरू असलेल्या नेतृत्वबदलाच्या चर्चेला अखेरीस काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी पूर्णविराम दिला आहे. राज्यात सध्या तरी नेतृत्व बदल होणार नाही. याबाबत पक्षाच्या नेत्या सोनिया गांधी व खासदार राहुल गांधी यावर लवकरच आपले मत स्पष्ट करतील, असे त्यांनी सांगितले. ते गुरुवारी (दि. ३०) गुलबर्ग्यात पत्रकारांशी बोलत होते.
ते पुढे म्हणाले, सध्या राज्यात मुख्यमंत्री पद रिक्त नाही. त्यामुळे, नेतृत्व बदलाचा प्रश्नच उद्भवत नाही. मात्र, योग्य वेळ आल्यावर हायकमांड यावर योग्य तो निर्णय घेईल.
पक्षाच्या नेत्या सोनिया गांधी व खासदार राहुल गांधी यांना राज्यातील सर्व घडामोडींची जाणीव आहे. त्यामुळे, ते लवकरच याबाबत भाष्य करतील. तोपर्यंत नेतृत्वबदलाच्या चर्चांना काही अर्थ नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्रिपदासाठी माझ्या नावाची चर्चा होत असल्याचे तुम्ही मला नेहमी सांगत असता, पण तो सर्व नशिबाचा खेळ आहे.
तसेच विशेष म्हणजे विचारधाराही महत्त्वाची असते. त्यामुळे, राज्यात नेतृत्व बदलावरून सुरू असलेल्या गोंधळावर लवकरात लवकर योग्य तो तोडगा काढला जाईल, असे खर्गे यांनी सांगितले.