निपाणी : वेदगंगा नदी पूर्णपणे कोरडी पडल्याने निपाणी शहराचा पाणी प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. काळम्मावाडी धरण प्रशासनाने पाणी सोडण्यास उशीर केल्याने ही समस्या उद्भवली असून, निपाणी नगरपालिकेने पाणीपुरवठ्यात मोठी कपात केली आहे. आता शहरात आठ दिवसांनी एकदा पाणीपुरवठा होणार आहे.
पाण्याची टंचाई दूर करण्यासाठी नदी पात्रातील तिसरा व्हॉल्व ओपन केला. मात्र या व्हॉल्वमधून येणाऱ्या पाण्यातून किडे, गाळ आणि दुर्गंधीयुक्त रिती येत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून येत आहेत. दूषित पाणीपुरवठ्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
शहरातील अनेक भागांत लहान मुलांना पोटदुखी, उलट्या आणि जुलाबाचा त्रास सुरू झाला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. दरम्यान, नगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने नागरिकांना पाणी उकळून प्यावे. दरम्यान प्रशासनाकडून टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याचे नियोजन सुरू आहे.
विशेषत: निपाणी शहरासह ग्रामीण भागातील अनेक गावांना वेदगंगा नदीतून पाणीपुरवठा होतो सध्या पात्र कोरडे पडल्याने अनेक गावातील नागरिकांना पिण्याचे पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. गेल्या महिन्याभरात दोन अवकाळी पाऊस झाले आहेत सध्या वेदगंगेत ठीक ठिकाणी असलेले पाणी गढूळ झाले आहे त्यामुळे आता नागरिकांनी असलेले पाणी जपून वापरणे गरजेचे आहे.