निपाणी : पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गाच्या सहापदरीकरणाअंतर्गत निपाणी परिसरातील राधानगरी-मुरगुड रोडवरील उड्डाणपुलाखालील मुख्य बोगद्याचे रुंदीकरण काम पूर्ण झाले असून, मंगळवारपासून दोन्ही बाजूंचा भुयारी मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. गेल्या तीन महिन्यांपासून सुरू असलेली एकेरी वाहतूक आणि त्यामुळे होणारी कोंडी आता संपुष्टात आली असून वाहनधारकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
दरम्यान या ठिकाणी होणाऱ्या वाहतूक कोंडीबाबत दै.पुढारीने ४ मार्चच्या अंकात “३ महिने होणार वाहतुकीची गैरसोय” या आशयाचे वृत्त प्रसिद्ध केले होते. अखेर हे वृत्त खरे ठरले असून त्यानुसार या-भरारी पथकाचे निरीक्षण संतराम माळगे म्हणाले, "युद्धपातळीवर काम करून दोन्ही बाजूंचे रुंदीकरण नियोजित वेळेत पूर्ण केले. आता दुतर्फा दहा मीटरचा सेवा रस्ता उपलब्ध झाल्याने भविष्यातील वाढती वाहतूक लक्षात घेता हा बदल दीर्घकालीन दिलासा देणारा ठरणार आहे."
यामध्ये बस, ट्रक, कंटेनर, जेसीबी यांसह लहान-मोठ्या वाहनांची गर्दी आणि विद्यार्थ्यांची वर्दळ असलेल्या या मार्गावरील धोकादायक परिस्थिती आता निवळली आहे. "तात्पुरती गैरसोय सहन केली, पण आता कायमस्वरूपी दिलासा मिळाल्याची प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली."
दरम्यान भुयारी मार्गातून दुतर्फा वाहतूक सुरु झाली असली तरी भुयारी मार्गाला लागून दोन्ही बाजूने महामार्गाचे काम वेगात सुरू आहे. त्यामुळे वाहनधारकांनी या टापुतून वाहन चालवताना खबरदारी घ्यावी. असे आवाहन रस्ते देखभाल कंपनीच्यावतीने करण्यात आले आहे.
भुयारी मार्गाचे काम सुरू झाल्यानंतर गेल्या तीन महिन्यापासून याठिकाणी वाहतुकीची कोंडी मोठ्या प्रमाणात होत होती. याबाबत अनेक सामाजिक संघटनांनी तसेच वैयक्तिक पातळीवर तहसील,पोलीस, लोकप्रतिनिधी यांना निवेदन दिले होते. अखेर या भुयारी मार्गातून दुतर्फा वाहतूक सुरू झाल्याने वाहतुकीचा ताण कमी झाला आहे.– निकु पाटील, अध्यक्ष, टाऊन प्लॅनिंग, निपाणी