निपाणी : पुणे-बंगळुर राष्ट्रीय महामार्गावर निपाणीहुन कोल्हापूरकडे होणारी आंतरराज्य सर्व प्रकारची वाहतूक सुरू झाली आहे. आज (दि.२६) सकाळी महामार्गावर सौंदलगा हद्दीत मांगुर फाटा या टापूत शेतवडीसह वेदगंगेतुन पूर्वेकडील बाजूस आलेल्या बॅक वॉटरमुळे पर्यायी महामार्गवर पाणी आल्याने कोल्हापूरहून बेळगावकडे जाणारी वाहतूक काही काळ थांबली होती.
पुणे-बंगळुर राष्ट्रीय महामार्गावर निपाणीहुन कोल्हापूरकडे होणारी वाहतूक सुरू झाली आहे.पोलीस व रस्ते देखभाल औताडे कंपनीने पूर्वेकडील रस्त्याच्या बाजूला चर काढत सिमेंट पाईप घालून पर्यायी महामार्ग सर्विस रोडवर आलेले पाणी मार्गस्थ केले. त्यामुळे कोल्हापूरहून-बेळगावकडे होणारी वाहतूक सुरू झाली. त्यामुळे कोल्हापूर बेळगाव हा एकेरी महामार्ग बंद होण्याचा मार्ग तूर्तास तरी टळला आहे.
आज (दि.२६) सकाळी पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर सौंदलगा हद्दीत मांगुर फाट्याजवळ कुंभार शेताजवळ महामार्गाला पर्याय म्हणून सुरू ठेवलेल्या सर्विस रोडवर वेदगंगेच्या नदीपात्रातील बॅक वॉटरचे पाणी आले होते. त्यामुळे कोणत्याही क्षणी कोल्हापूरहून बेळगावकडे होणारी वाहतूक बंद होण्याची शक्यता निर्माण झाली होती. याकाळात प्रशासनानेही खबरदारी म्हणून लहान वाहनांना प्रवेश बंदी केली होती.
ही बाब लक्षात घेऊन, तहसीलदार एम.एन.बळीगार, डीएसपी गोपाळकृष्ण गौडर, सीपीआय बी.एस.तळवार, उपनिरीक्षक शिवराज नाईकवाडी यांच्या रस्ते देखभाल कंपनीच्या भरारी पथकाचे निरीक्षक संतराम माळगे, अक्षय सारापुरे यांच्यासह कर्मचाऱ्यांनी शेतवडीसह वेदगंगा पात्रातुन येणाऱ्या पाण्याला रस्त्याच्या बाजूला चर मारून पाईप घालून मार्ग उपलब्ध करून दिला. त्यामुळे कोल्हापूरहून बेळगावकडे होणारी व खोळंबलेली वाहतूक विना अडथळा सुरू झाली. दुपारी १ नंतर कोल्हापूरहून बेळगावकडे होणारी वाहतूक पूर्ववत सुरू झाली.
सद्यस्थितीत राष्ट्रीय महामार्गाच्या सहापदरीकरण कामाच्या दरम्यान मांगुर फाटा येथे भुयारी पुलाचे बांधकाम अर्धवट झाले आहे. पिलर टाकून पुलाचे बांधकाम झालेले नाही. केवळ विट भिंत उभा करून मुरमाचा भराव टाकल्याने ही समस्या उद्भवली आहे. यामध्ये मांगुर फाटा या ठिकाणी उभारण्यात येणारा उड्डाणपूल हा पिलर टाकून बांधण्यासाठी केंद्र सरकारकडून मंजुरी मिळाली आहे. अद्यापही हे काम अपूर्ण आहे.
येत्या काळात पश्चिमेकडून महाराष्ट्रात येणाऱ्या धरणांतील पाणी वेदगंगेत सोडल्यानंतर पाण्याचा फुगवटा येऊन पश्चिमेकडून पाणी आल्यानंतर महामार्ग बंद राहू शकतात. मात्र सद्यस्थितीत पश्चिमेकडून महामार्गावर पाणी आलेले नाही. त्यामुळे निपाणीहुन कोल्हापूरकडे सद्यस्थितीत सर्व प्रकारची वाहतूक सुरू आहे. मात्र या पाण्याचा विसर्ग वाढला तर पहिल्यांदा महामार्गावर या टापूत पूर्वेकडून पाणी येवू शकते. मात्र सद्यस्थितीत या टापूत दोन्ही बाजूनेही महामार्गावरील पुराचे पाणी येण्याचा धोका टळला आहे. त्यामुळे निपाणी-कोल्हापूर व कोल्हापूर बेळगाव या दोन्ही मार्गावरील वाहतूक सद्यस्थितीत विना अडथळा सुरू आहे.
जिल्हा प्रशासनाने अतिवृष्टीमुळे पुरसदृश परिस्थिती निर्माण होवू लागल्याने नदी काठावरील नागरिकांना अडचण असल्यास ०८३१-२४०७२९०, ११२, ०८३१-२४७४०५४ या हेल्पलाइन टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.