निपाणी : जिंदगी के साथ भी और जिंदगी के बाद भी... अशी ग्वाही देणाऱ्या एलआयसी प्रतिनिधींच्या आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या जीवावर आलेले संकट रहदारी कोंडीमुळे दूर झाले असून, नेपाळमधील लुंबिनीला पोचलेले आणि तेथून काठमांडूकडे वाटचाल करणाले निपाणी परिसराती २१ जण सुखरुप बचावले आहेत.
एलआयसीमार्फत निपाणी शहर व परिसरातील विमा प्रतिनिधी आणि कुटुंबीयांसाठी आयोजित करण्यात आलेल्या नेपाळ पर्यटन दौऱ्याला काठमांडूला पोचण्याआधीच ब्रेक लागला. २० ऑगस्टरोजी धार्मिक पर्यटनासाठी नेपाळला रवाना झालेले २१ जण भोटेकोशी नदीला आलेल्या पुरामुळे शुक्रवारी भारतात परतले. सोमवारी ते निपाणीत परतणार आहेत.
काशी, अयोध्या आणि गोरखपूर धार्मिक स्थळांना दिल्यानंतर या पथकाने नेपाळमध्ये प्रवेश केला. नेपाळमधील लुंबिनी येथे भगवान गौतम बुद्धांचे जन्मस्थळ, हिमालयाच्या कुशीत सुमारे १३ हजार ८०० फूट उंचीवर असलेले प्रसिद्ध मुक्तीनाथ मंदिर तसेच मनकामना देवीचे दर्शन घेतले. पुढे ते काठमांडूकडे निघाले असतानाच भोटेकोशी नदीला अचानक पूर आला. पुराच्या पाण्यासोबत मोठ्या प्रमाणात चिखल आणि मलबा रस्त्यावर आल्याने रहदारी खोळंबली. पोखरा-काठमांडू मार्गावर कोंडी निर्माण झाल्यानंतर सुरक्षिततेला प्राधान्य देत काठमांडूचा नियोजित प्रवास रद्द करण्यात आला. त्यानुसार सर्व २१ प्रवासी शुक्रवारी भारताच्या सीमेवर दाखल झाल्याची माहिती प्रवाशांनी दिली.
रितेश नलगे, कलावती जाधव, सलोनी जाधव, अनिल खोत (निपाणी), सचिन मोहिते (अकोळ), आनंद संकपाळ, चंद्रकला संकपाळ, रामचंद्र संकपाळ, संगीता संकपाळ (यरनाळ), विनोद सासमिले, विजयमाला सासमिले (गजबरवाडी), उत्तम नलवडे, सुजाता नलवडे (हंचनाळ), सागर जाधव, संध्या जाधव (भिवशी), सुरेश मांगलेकर, सुरेखा मांगलेकर (मांजरी), सुभाष भादुले (बुदिहाळ), राजेंद्र यादव (मनोचीवाडी), महेश गावडे (खडकलाट) व शिवाजी शिंदे (म्हाकवे) अशी या पर्यटकांची नावे आहेत.