कारवार : ऐकावं ते नवलंच या उक्तीप्रमाणे भटकळ येथे चक्क नववधू-वरास नातेवाईकांनी चक्क भरलेला सिलिंडर भेटीदाखल दिला आहे. त्यामुळे सध्या हा राज्यात चर्चेचा विषय बनला आहे.
सध्या देशात एलपीजी गॅसची टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे दिवस उजाडताच अनेक लोक गॅस एजन्सीसमोर रांगेत उभे राहून सिलिंडर मिळवण्यासाठी धडपडत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. विवेक महाले व नागसंध्या शांती यांचे लग्न काल पार पडले. त्यांना नवसंसाराची भेट म्हणून नातेवाईकांनी सिलिंडर दिले. भेटीचे दृष्य आपल्या मोबाईल मध्ये कैद करून सोशल मीडियावर पाठवले गेले. मात्र या प्रकारामुळे हे जोडपे अडचणीत आले असून तालुका प्रशासनाने नवरदेवाला नोटीस बजावली आहे. गर्दीच्या ठिकाणी सिलिंडर नेणे धोकादायक असल्याने ही नोटिस बजावण्यात आलेल्या समजते. तथापि, लग्नानंतर नवदांपत्य तिरुपतीला गेले आहे. पण नोटिसीची माहिती मिळताच त्यांच्या आनंदात खडा पडला आहे.
दरम्यान, भटकळचे तहसीलदार नागेंद्र कोलशेट्टी म्हणाले, भटकळ तालुक्यात एलपीजी सिलिंडरची टंचाई नाही. पण गॅस सिलिंडर भेट म्हणून देता येत नाही आणि देऊही नयेत. मी यासंदर्भात अन्न निरीक्षकांकडून अहवाल मागवला आहे. हा अहवाल कारवार जिल्हा प्रशासनाला पाठवला जाईल.