बेळगाव : विधानसभेत बोलताना आमदार लक्ष्मण सवदी.  (Pudhari Photo)
बेळगाव

...म्हणे मुंबईवर कर्नाटकचा हक्क! काँग्रेस आमदार लक्ष्मण सवदी बरळले, महाराष्ट्रातून संताप व्यक्त

Laxman Savadi | सवदींनी वाजवली दरवर्षीची टेप

पुढारी वृत्तसेवा

बेळगाव : पुढारी वृत्तसेवा; सीमाभागातील मराठी भाषिकांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात आवाज उठवताना शिवसेनेने (ठाकरे गट) बेळगाव केंद्रशासित करण्याची मागणी केली होती. त्यामुळे पोटशूळ उठलेले अथणीचे काँग्रेस आमदार लक्ष्मण सवदी (Laxman Savadi) यांनी आता थेट मुंबईवरच दावा सांगितला आहे. मुंबईवर आमच्या पूर्वजांनी राज्य केले असल्याने मुंबई कर्नाटकाला देण्यात यावी, अशी मुक्ताफळे उधळताना मुंबईच केंद्रशासित करण्याची अव्यवहार्य मागणीही त्यांनी केली. कर्नाटक (Karnataka) विधानसभेत बुधवारी (दि. १८) उत्तर कर्नाटकातील समस्यांवर चर्चा करण्यासाठी अध्यक्ष यू. टी. कादर यांनी वेळ निश्चित केली होती. त्यावेळी बोलताना आमदार सवदी महाराष्ट्रातील नेत्यांवर आणि मुंबईवर घसरले.

महाराष्ट्रातील काही मतीहीन लोक बेळगाव केंद्रशासित करावे, अशी मागणी करत आहेत. उत्तर कर्नाटकातील बेळगाव, कारवार, धारवाड हे जिल्हे मुंबई प्रांताचा भाग होते. त्यावेळी आमचे लोकप्रतिनिधी मुंबई विधानसभेवर निवडून जात होते. त्यामुळे. मुंबईवर आमचा हक्क असून, ती कर्नाटकाला द्या, अशी माझी मागणी आहे. बेळगाव नव्हे तर मुंबई केंद्रशासित करावी, असा प्रस्ताव केंद्र सरकारला पाठवण्यात यावा, असे अकलेचे तारे त्यांनी तोडले.

बेळगाव ह कर्नाटकाचा अविभाज्य भाग आहे. महाजन अहवाल आम्ही मान्य केला आहे. त्यामुळे बेळगाव ही आमच्यासाठी दुसरी राजधानी आहे. हा भाग आपला असल्यामुळेच आम्ही याठिकाणी सुवर्णसौध उभारली असून दरवर्षी हिवाळी अधिवेशन घेण्यात येत आहे, असेही आमदार लक्ष्मण सवदी यांनी सांगितले. महाराष्ट्र आणि मुंबईवर आगपाखड करून झाल्यानंतर त्यांनी उत्तर कर्नाटकातील समस्यांवर मनोगत व्यक्त केले.

सवदींची दरवर्षीची टेप

बेळगावातील हिवाळी अधिवेशनात आमदार सवदी मुंबई आमची आहे. ती कर्नाटकाला द्या, मुंबई केंद्रशासित करा, बेळगाव आमचेच आहे, अशी टेप वाजवतात. यंदाही त्यांनी याच मागणीची पुनरुच्चार केला. पण, यंदा त्यांच्या आधी काँग्रेसचे विधान परिषद सदस्य नागराजू यांनी ही मागणी केली होती. त्यामुळे, या नेत्यांबाबत मराठी जनतेत तीव्र संताप व्यक्त होत आहे.

मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याची भाषा खपवून घेणार नाही- आदित्य ठाकरे

काँग्रेस आमदार लक्ष्मण सवदी यांनी केलेल्या वक्तव्यावर महाराष्ट्रातील नेत्यांनी संताप व्यक्त केला आहे. ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांनी, मुंबई केंद्रशसित करण्याची मागणी निषेधार्ह असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. ''काँग्रेस असो वा भाजप... कोणताही पक्ष असो... मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याची भाषा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) अजिबात खपवून घेणार नाही. मुंबई ही आमची मायभूमी आहे. इथला प्रत्येक कण मराठी माणसानं आपलं रक्त सांडून मिळवला आहे. मुंबई आम्हाला कोणी आंदण दिलेली नाही. काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींनी आपल्या आमदारांना समज द्यावी.'' असे आदित्य ठाकरे यांनी X ‍‍‍‍‍‍‍‍‍‍वरील पोस्टमध्ये म्हटले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT