विजापूर : मातेने तीन मुलांना विहिरीत फेकून नंतर स्वतः विहिरीत उडी घेऊन जीवन संपवल्याची घटना इंडी तालुक्याच्या मिरागी गावात गुरुवारी सायंकाळी घडली. राजश्री शंकरप्पा हल्लूर (वय 28), अनुश्री (वय 6), तनू (वय 3) आणि संतोष (वय 1) अशी त्यांची नावे आहेत.
राजश्रीचा पती शंकरप्पा हा खासगी बसचालक आहे. घटनेची माहिती मिळताच तिचा पती व राजश्रीचे कुटुंबीय घटनास्थळी आले. पोलिसांच्या मदतीने मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आले. पती शंकरप्पा हाच मुलांच्या आणि पत्नी राजश्रीच्या मृत्यूसाठी जबाबदार असल्याची तक्रार राजश्रीच्या कुटुंबीयांनी दाखल केली आहे.
मालमत्तेच्या वादातून ही घटना घडल्याचे ऐकायला मिळत आहे. इंडी तालुका रुग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. या घटनेची नोंद इंडी ग्रामीण पोलिस ठाण्यात झाली असून, पुढील तपास सुरू आहे.