बेळगाव : पतीला सोडून दुसर्या जातीच्या तरुणासोबत पळून गेल्याच्या रागातून माहेरच्या लोकांनीच आपल्या मुलीला जबरदस्तीने विष पाजून खून केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पुरावा मिटवण्यासाठी मृतदेह सांगली जिल्ह्यातील आरग येथे परस्पर दहन केल्याचेही तपासात स्पष्ट झाले आहे. त्याबद्दल विवाहितेचा भाऊ, काकासह तिघांना अटक करण्यात आली आहे.
सत्यव्वा संतोष हेळवी (वय 24) असे दुर्दैवी महिलेचे नाव आहे. 21 मार्चरोजी घडलेली ही घटना आता उजेडात आली आहे. सत्यव्वाचा काका प्रकाश भीमाप्पा हळवर (वय 46), भाऊ शानूर सदाशिव हळवर (वय 35) व भाऊजी कल्लाप्पा मायाप्पा हेळवी (वय 40, तिघेही रा. नदीगुडी, ता. हुक्केरी) अशी अटक केलेल्या तीन संशयितांची नावे आहेत. त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.
सत्यव्वाचा चार वर्षांपूर्वी रायबाग तालुक्यातील हणबरट्टी येथील संतोष हेळवी याच्याशी विवाह झाला होता. परंतु, सत्यव्वाचे माहेरगावातील म्हणजे नदीगुडीतील कृष्णा सहदेव पाटील नामक तरुणावर लग्नाच्या आधीपासून प्रेम होते. लग्नानंतरही ते एकमेकाच्या संपर्कात होते. त्यामुळे 17 फेब्रुवारीरोजी सत्यव्वा पतीच्या घरातून पळून कृष्णाकडे गेली. हे दोघेजण बेळगावात भाडोत्री घर करून राहात होते.
विष पाजून जाळले
तुझे दुसरे लग्न आपल्या जातीतील तरुणाशी करून देतो, असे सत्यव्वाला गाठून माहेरच्या लोकांनी सांगितले. परंतु, सत्यव्वा ऐकायला तयार नव्हती. त्यामुळे त्याच रात्री त्यांनी तिला जबरदस्तीने पकडून विष पाजले. कुटुंबीयांनी तिचा मृतदेह आरग स्मशानात जाळला.