बेळगाव : बेळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष अण्णासाहेब जोल्ले यांच्या विधानाचा चुकीचा अर्थ लावण्यात आला आहे. बँक नफा मिळवते की तोटा हे महत्वाचे नाही. त्यापेक्षा शेतकऱ्यांचे हित महत्वाचे आहे. आरबीआय आणि नाबार्डच्या निर्देशांनुसारच शेतकऱ्यांना कर्ज दिलेच पाहिजे, असे पालक मंत्री सतीश जारकीहोळी यांनी सांगितले. जिल्हाधिकारी कार्यालयात ते शुक्रवारी (दि. 13) पत्रकारांशी बोलत होते.
ते म्हणाले, बीडीसीसी बँक ही शेतकऱ्यांची बँक आहे. बँकांनी शेतकऱ्यांना कर्ज दिले पाहिजे. परंतु, आरबीआय आणि नाबार्डच्या निर्देशांनुसारच कर्ज दिले पाहिजे. बँक साखर कारखान्यांसह खासगी व्यक्तींना विकासाच्या दृष्टिकोनातून कर्ज देत आहे. शेतकऱ्यांना दिलेली कर्ज मर्यादा वाढवणे बीडीसीसी बँकेच्या हातात नाही. शेतकऱ्यांना कर्ज मर्यादा वाढविण्याचा अधिकार आरबीआय आणि नाबार्डच्या हातात आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
आमदारांनी त्यांच्या संबंधित विभागांना आवश्यक असलेल्या कामांसाठी अर्थसंकल्पीय अनुदान मागितले आहे. बेळगाव जिल्ह्याने अर्थसंकल्पात अधिक निधी मागितलेला नाही. विभागांना मिळणाऱ्या निधीतून जिल्ह्याला आवश्यक असलेली विकासकामे आम्ही करु. सिंचनासाठी अधिक निधी मिळेल असा विश्वास मंत्री जारकिहोळी यांनी व्यक्त केला. यावेळी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष विनय नावलगट्टी, शकील मुल्ला, मल्लेश चौगुले आदी उपस्थित होते.