कारवार : कॉलेजची फी भरण्यासाठी वडिलांनी दिलेले पैसे एका ओळखीच्या व्यक्तीला उसने दिल्यानंतर ते नियोजित वेळेत परत न मिळाल्याने एका विद्यार्थिनीने जीवन संपवले. कारवार जिल्ह्यातील बेळकीमध्ये (ता. भटकळ, जि. कारवार) शनिवारी (दि. १३) ही घटना घडली. गायत्री नागराज नायक असे तिचे नाव आहे.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी, गायत्री ही भटकळमध्ये बीसीएचे शिक्षण घेत होती. कॉलेजची फी भरण्यासाठी वडील नागराज यांनी तिला १० हजार रुपये दिले होते. नेमके त्याचवेळी गावातील तिच्या ओळखीच्या संतोष नायकने वेळेवर परतफेड करण्याचे सांगून तिच्याकडून १० हजार रुपये मागून घेतले होते.
मात्र, नियोजित वेळेनंतरही त्याने पैसे परत न केल्याने गायत्रीला तिच्या कॉलेजची फी भरता आली नाही. फी न भरल्यामुळे तिला परीक्षेचे हॉल तिकीटही मिळाले नाही. यामुळे व्यथित होऊन गायत्रीने गावातील विहिरीत उडी मारुन आत्महत्या केली आहे. या घटनेप्रकरणी भटकळ ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.