बंगळूर : राज्यातील भाजप नेत्यांची लयास गेलेली प्रतिष्ठा, वैयक्तिक स्वार्थ व अंतर्गत कलहामुळे विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजप आमदारांनी क्रॉस व्होटिंग केल्याचा गंभीर आरोप माजी मुख्यमंत्री व भाजपचे ज्येष्ठ नेते डी. व्ही. सदानंदगौडा यांनी केला आहे. ते सोमवारी (दि. २२) बंगळुरात पत्रकारांशी बोलत होते.
ते म्हणाले, राज्यातील नेते केवळ स्वतःचे अस्तित्व टिकवण्याचा प्रयत्न करत आहेत. खरंतर त्यांनी सर्वप्रथम पक्षासाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना सक्षम केले पाहिजे. आता कुणी क्रॉस व्होटिंग केले हे शोधण्यापूर्वी या सर्व मुद्द्यांवर मुख्य समितीच्या सदस्यांशी चर्चा करून निर्णय घेण्यात आले होते का, असा सवाल त्यांनी केला आहे.
निवडणुकीपूर्वी उमेदवार निवड प्रक्रियेदरम्यान तुम्ही कोअर कमिटीची बैठक घेतली होती का? किमान एकाचे तरी मत विचारले होते का? कुणाशीही सल्लामसलत न करता एकतर्फीपणे सर्व काही केल्याचा परिणाम म्हणजे आजचा पराभव आहे. आता धर्मस्थळाला शपथ घेण्यासाठी जात असताना मी प्रदेशाध्यक्षांना फोन करून कोणत्याही कारणास्तव धर्मस्थळच्या ठिकाणी राजकारण आणणे योग्य नसल्याचे त्यांनी सांगितले.