विजापूर : शहराबाहेरील ऐतिहासिक भूतनाळ तलावात आईसह पाच मुलांचा बुडून मृत्यू झाल्याच्या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. ही घटना नेमकी कशी घडली, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या घटनेमागे अन्य काही कारण आहे का, याचाही पोलिसांकडून तपास सुरू आहे. महिलेचा पती मल्लिकार्जुन जालगेरी यांचीही चौकशी करण्यात येणार असून पोलिसांकडून सर्व शक्यता तपासल्या जात आहेत.
शोभा जालगेरी आणि त्यांचे पती मल्लिकार्जुन यांच्यात २३ ऑगस्टच्या रात्री श्रावण सोमवारच्या पूजेवरून तसेच स्वयंपाक करण्याच्या कारणावरून वाद झाला होता. त्यानंतर शोभा मुलांसह घरात झोपल्या होत्या. मल्लिकार्जुन घराबाहेर झोपले. दुसऱ्या दिवशी सकाळी पत्नी आणि मुले घरात आढळून आली नसल्याने त्यांनी गावात तसेच विजापूर शहरात त्यांचा शोध घेतला.
मात्र, ते सापडले नसल्याने त्यांनी २४ रोजी मल्लिकार्जुन यांनी विजापूर ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. बुधवारी सकाळी भूतनाळ तलावात ६ मृतदेह आढळल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर डीवायएसपी नागराज, आदर्शनगर पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक सीताराम लमाणी, पोलिस कर्मचारी आणि अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह तलावातून बाहेर काढून रुग्णालयात पाठविण्यात आले. प्राथमिक तपासात घरातून बाहेर पडल्यानंतर तलावात पडून त्यांचा मृत्यू झाला असण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.