बंगळूर : वाल्मिकी विकास महामंडळातील कथित गैरव्यवहाराच्या आरोपांमुळे बी. नागेंद्र यांनी काँग्रेस हायकमांडच्या सल्ल्यानुसार शुक्रवारी मंत्रिपदाचा राजीनामा दिला. आमदारकीचाही राजीनामा देण्यास तयार असून, जनतेच्या न्यायालयात जाऊ, असे आव्हान त्यांनी भाजप नेत्यांना दिले आहे.
काँग्रेस हायकमांडच्या सूचनेनुसार दिल्लीला गेलेले नागेंद्र यांनी काँग्रेसचे वरिष्ठ नेते राहुल गांधी यांच्यासह ज्येष्ठ नेत्यांची भेट घेतली. त्यानंतर बंगळूरला परतल्यानंतर शुक्रवारी त्यांनी मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांची भेट घेतली. चर्चेनंतर पत्रकारांशी बोलताना बळ्ळारी-कुडलगीचे आमदार असलेले नागेंद्र यांना अश्रू अनावर झाले.
ते म्हणाले, आपल्याविरोधात भाजपकडून सातत्याने अपप्रचार केला जात आहे. त्यामुळे पक्षाला, नेतृत्वाला व मुख्यमंत्री शिवकुमार यांच्या नेतृत्वाखालील सरकारला कोणत्याही प्रकारे अडचण निर्माण होऊ नये, यासाठी पक्षहिताचा विचार करून मंत्रिपदाचा राजीनामा देत आहे. मी कोणत्याही दबावाखाली येऊन राजीनामा देत नसून स्वेच्छेने देत आहे. आमदारकीचाही राजीनामा देण्यास तयार आहे. हायकमांडने तो स्वीकारावा.
भाजपवर टीका
नागेंद्र यांनी बळ्ळारीच्या भाजपच्या नेत्यांना लक्ष्य केले. ते म्हणाले, जनार्दन रेड्डी साहेब, श्रीरामुलू अण्णा, आगामी विधानसभा निवडणूक लढवूया. मी घोटाळा केला असल्याचे सांगत असाल, तर जनतेसमोर जाऊया.
मी कोणताही गैरव्यवहार केलेला नाही. कोणत्याही आदेशावर स्वाक्षरी देखील केलेली नाही, महामंडळाचा पैसा माझ्या खात्यात आलेला नाही. माझ्या विरोधातील आरोपांना ठोस पुरावे कुठे आहेत, असा सवालही नागेंद्र यांनी केला.
कुमारस्वामींवर खटला का नाही?
केंद्रीय मंत्री एच. डी. कुमारस्वामी यांच्याविरोधात तीन वर्षांपासून खटला चालविण्याची परवानगी मागण्यात आली आहे. त्यावर अद्याप निर्णय का झाला नाही? त्यांच्यासाठी एक नियम व आमच्यासाठी दुसरा नियम का, असा सवालही नागेंद्र यांनी केला.