बंगळूर : सरस्वती सन्मान आणि पद्मभूषण पुरस्कार विजेते, प्रख्यात कन्नड कादंबरीकार, विचारवंत, ‘पर्व’कार आणि ज्येष्ठ लेखक एल. एल. भैरप्पा यांचे वयाच्या 94 व्या वर्षी बुधवारी दुपारी बंगळूरमधील खासगी रुग्णालयात निधन झाले. ते राहायला म्हैसूरला होते. त्यांच्यावर म्हैसूरमध्येच शुक्रवारी दुपारी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी शोक व्यक्त केला आहे.
भैरप्पांंनी कन्नडमध्ये 25 कादंबर्यांचे लेखन केले. त्यांचे कथासंग्रह, आत्मचरित्र, तत्त्वज्ञानविषयक पुस्तकेही प्रसिद्ध आहेत. त्यांच्या अनेक कादंबर्यावर कन्नडमध्ये चित्रपट बनले. त्यांच्या कादंबर्यांचा मराठी, हिंदी, इंग्रजीसह इतर भारतीय भाषांमध्ये अनुवाद झाला आहे. पर्व, काठ, धर्मश्री, तडा, आवरण, वंशवृक्ष या त्यांच्या गाजलेल्या कादंबर्या. त्या मराठीमध्येही अनुवादित आहेत. तीन महिन्यांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. गुरुवारी दुपारपर्यंत बंगळूर येथील रवींद्र भवन येथे त्यांचा मृतदेह अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार असून, त्यानंतर मृतदेह म्हैसूरला नेण्यात येणार आहे. साहित्य क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांना 2010 मध्ये सरस्वती सन्मान, 1975 मध्ये साहित्य अकादमी पुरस्कार आणि 2023 मध्ये पद्मभूषण यासह अनेक महत्त्वाच्या पुरस्काराने गौरविण्यात आले होते.