बेळगाव : नैऋत्य रेल्वेतर्फे आषाढी एकादशीनिमित्त वारकऱ्यांच्या सोयीसाठी विशेष रेल्वेफेरीचे आयोजन करण्यात आले आहे. धारवाड-पंढरपूर-धारवाड या मार्गावर ही विशेष रेल्वेफेरी असणार आहे.
दरवर्षी बेळगाव, हुबळी, धारवाड या परिसरातून हजारो भाविक आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला जातात. बेळगावहून पंढरपूरला जाण्यासाठी थेट रेल्वे उपलब्ध नसल्याने प्रवाशांची गैरसोय होते. त्यामुळे, विशेष रेल्वे सोडण्याची मागणी केली जात होती. एकूण दहा डबे असलेली रेल्वे २३ ते २८ जुलै दरम्यान सहा फेऱ्या करणार आहे. आठ जनरल, तर दोन स्लीपर कोच ठेवण्यात आले आहेत.
सकाळी ६ वाजता धारवाडमधून निघालेली एक्स्प्रेस ७.४९ वाजता खानापूर, सकाळी ८.३० वाजता बेळगाव, सकाळी ९.३० वाजता घटप्रभा, दुपारी १२.२० वाजता मिरज तर दुपारी ४.५० वाजता पंढरपूरला पोचणार आहे. तर परतीच्या प्रवासात सायंकाळी ६.४० वाजता पंढरपूरहून निघणार असून मध्यरात्री १.२० वाजता बेळगावला तर पहाटे ४.३० वाजता धारवाडला पोचणार आहे.
सदर एक्स्प्रेस धारवाड, लोंढा, खानापूर, देसूर, बेळगाव, पाच्छापूर, गोकाक रोड, घटप्रभा, चिकोडी रोड, रायबाग, कुडची, उगार, शेडबाळ, विजापूर, मिरज, अरग, सांगोला व पंढरपूर या रेल्वे स्थानकांवर थांबणार आहे. यामुळे परिसरातील भाविकांना सोयीचे होणार आहे.