बेळगाव : क्रांतिज्योती विद्यालय चित्रपटाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील मराठी शाळांचे विदारक चित्र मांडले. त्याला सर्वस्तरातून प्रतिसाद मिळाला. आता लोकशाही मार्गाने सर्वात दीर्घकाळ चाललेला सीमालढा व बेळगावची बोलीभाषा सिनेमाच्या माध्यमातून महाराष्ट्रात सर्वदूर पोचवू, अशी ग्वाही सुप्रसिद्ध मराठी सिनेदिग्दर्शक हेमंत ढोमे यांनी दिली.
महाराष्ट्र एकीकरण युवा समितीतर्फे रविवारी (दि. 1) मराठा मंदिरात मराठी भाषा गौरव दिन कार्यक्रम झाला. त्यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. त्यांनी ‘अस्तित्व मराठी शाळेचे, संवर्धन मराठी भाषेचे’ आपले विचार मांडले. युवा समितीचे अध्यक्ष अंकुश केसरकर अध्यक्षस्थानी होते.
ते पुढे म्हणाले, मातृभाषेतून शिकले तर घोडे कुठेच अडत नाही. मराठी माध्यमातून शिकलेल्या अनेक विद्यार्थ्यांनी मोठमोठ्या पदांपर्यंत मजल मारली आहे. इंग्रजी भाषाही ते चांगल्या पद्धतीने बोलू शकतात. महाराष्ट्रात मराठी शाळांना वाईट दिवस आले आहेत. पालकांचा ओढा इंग्रजी माध्यमाकडे आहे. हीच परिस्थती सीमाभागातही आहे. देशातील तुळू भाषा नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. भाषा टिकली नाही तर संस्कृती टिकणार नाही. मराठी संपू नये ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. यामध्ये मराठी शाळेत शिकवणाऱ्या शिक्षकांचा फार मोठा वाटा आहे. माझ्याकडून मराठी भाषेसाठी मराठी शाळांसाठी जे काही करता येईल त्यासाठी मी सदैव तयार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. शिवराज चव्हाण यांनी परिसंवादात ढोमे यांची मुलाखत घेतली.
बेळगाव शहर, ग्रामीण व खानापूर तालुक्यातील दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र, पदक, स्मृतिचिन्ह, रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले. सामान्यज्ञान परीक्षेत यश मिळवलेल्या लहान व मोठ्या गटातील विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र, पदक, स्मृतिचिन्ह, रोख रक्कम देऊन उपस्थितांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. बेळगावसह खानापूर तालुक्यातील शाळांना युवा समिती आदर्श शाळा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
मध्यवर्ती म. ए. समिती कार्याध्यक्ष, माजी आमदार मनोहर किणेकर, सरचिटणीस मालोजी अष्टेकर, मराठा मंदिरचे अध्यक्ष अप्पासाहेब गुरव, प्रकाश मरगाळे, खानापूर म. ए. समिती अध्यक्ष गोपाळ देसाई, म. ए. समिती महिला युवा आघाडी रेणू किल्लेकर व्यासपीठावर होते. कार्यक्रमाला म. ए. समितीचे पदाधिकारी, शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, पालक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.