अस्वलाच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी  File Photo
बेळगाव

चार अस्वलांच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर

पुढारी वृत्तसेवा

खानापूर : शेताकडे जाताना चार अस्वलांनी हल्ला चढवल्याने विनोद जयवंत जाधव (४६) रा. मुंडवाड ता. खानापूर हा शेतकरी गंभीर जखमी झाला आहे. शनिवारी सकाळी आठच्या सुमारास मुंडवाड गावापासून दक्षिणेच्या बाजूला दोन किलोमीटर अंतरावरील शिवारात ही घटना घडली.

हातात असलेल्या कुन्हाडीने स्वतःचा बचाव करून घेण्यासाठी शेतकऱ्याने जीवाची शर्थ केली. त्याचवेळी इतर शेतकरीही त्याच्या मदतीला धावल्याने या जीवघेण्या हल्ल्यातून तो बचावला आहे. विनोद यांची जंगलालगत भात शेती आहे. वन्य प्राण्यांपासून पिकाचे रक्षण करण्यासाठी त्यांनी विद्युत कुंपण लावले आहे. या विद्युत कुंपणाला जोडलेला विद्युत प्रवाह बंद करण्यासाठी ते सकाळी शेताकडे जात होते. यावेळी जंगलातून आलेल्या चार अस्वलांनी त्यांच्यावर अचानक हल्ला चढविला.जवळील कुऱ्हाडीने प्रतिकार करून त्यांनी हा हल्ला परतावून लावण्याचा प्रयत्न केला.

शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण

या हल्ल्यात विनोद यांच्या पाय, छातीला तसेच डोळ्याजवळ गंभीर दुखापत झाली आहे. त्यांच्या ओरडण्याचा आवाज ऐकून आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी मदतीला धाव घेतली. दगड व काठ्यांनी अस्वलांना जंगलात पिटाळून लावले. या घटनेची माहिती मिळताच लोंढा वनविभागाचे वनक्षेत्रपाल तेज यांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमीला बेळगाव सिव्हिल इस्पितळात दाखल केले आहे. मांजरपै येथील अस्वलाच्या हल्ल्याची घटना ताजी असतानाच ही घटना घडल्याने परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT