खानापूर : पंपसेट चालू करण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याचा पाय घसरुन नाल्यात पडल्याने बुडून मृत्यू झाल्याची घटना शेडेगाळीजवळ (ता. खानापूर) शुक्रवारी (दि. 20) दुपारी घडली. देवाप्पा महादेव गुरव (वय 48, रा. शेडेगाळी) असे मृताचे नाव आहे.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी, देवाप्पा गुरव आपल्या मुलासह सकाळी पिकाला पाणी देण्यासाठी गेले होते. मुलाने पंपसेट सुरु केल्यानंतर घरात गॅस आल्यामुळे तो घरी परतला. त्याचवेली अचानक वीजपुरवठा खंडित झाल्याने पंप बंद पडला. त्यामुळे, पंप पुन्हा सुरू करण्यासाठी देवाप्पा नाल्याकाठी गेले असता तोल जाऊन पाय घसरला. ते थेट हालात्री नाल्याच्या पाण्यात पडले. पोहता येत नसल्याने ते पाण्यात बुडाले. घटनेच्या वेळी त्यांचा मोबाईल शेतातच राहिला. त्यामुळे, मुलाने संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता प्रतिसाद मिळाला नाही. संशय आल्याने मुलगा पुन्हा शेतात गेला. पण, वडील न दिसल्याने त्याने सर्वत्र शोध घेतला. त्यावेळी काठावर घसरुन पडल्याचे पावलांचे ठसे दिसून आले. त्याने पोलिस व अग्निशामक दलाला कळविले. काही वेळातच पोलिस व अग्निशामक दलाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.
स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने पात्रात शोधमोहीम राबवण्यात आली. जवळपास तीन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर देवाप्पा यांचा मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आला. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी खानापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवला. तपासणीनंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा आणि दोन मुली असा परिवार आहे.