बेळगाव : बेळगाव जिल्ह्यात उन्हाचा तडाखा मोठ्या प्रमाणात जाणवत असून, कुक्कुटपालन व्यवसायाला फटका बसला आहे. वाढत्या तापमानामुळे कोंबड्यांच्या मृत्यूचे प्रमाण वाढल्याने पोल्ट्री फार्म चालक आर्थिक संकटात सापडले आहेत. त्यातच कोंबड्यांच्या वजनातही घट झाल्याने एकूण उत्पन्नावर परिणाम झाला आहे.
जिल्ह्यातील तापमान ४० अंश सेल्सिअसपर्यंत गेल्यामुळे ब्रॉयलर कोंबड्यांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहेत. विशेषतः उष्णतेमुळे कोंबड्यांना श्वास घेण्यास अडथळा निर्माण होत असून फुफ्फुसाचे विकार बळावत असल्याचे चित्र आहे. सामान्यतः पोल्ट्री फार्ममध्ये ब्रॉयलर कोंबड्या ४० दिवसांत २ ते २.२ किलोग्रॅम वजनापर्यंत वाढतात. मात्र, सध्याच्या उष्णतेमुळे या कोंबड्यांना कमी भूक लागते, परिणामी त्यांचे वजन मोठ्या प्रमाणावर घटून ते केवळ १.४ ते १.५ किलो ग्रॅमपर्यंतच मर्यादित राहत आहे.
या परिस्थितीवर मात करण्यासाठी आणि संभाव्य नुकसान टाळण्यासाठी अनेक शेतकरी २५ ते ३० दिवसांच्या कोंबड्यांची विक्री करत आहेत. वजनात घट झाल्यामुळे बाजारभाव कमी मिळत असूनही, कोंबड्या दगावण्यापेक्षा त्यांची वेळेपूर्वी विक्री करणे शेतकऱ्यांनी पसंत केले आहे.
पोल्ट्री फार्ममधील कोंबड्यांना उष्णतेपासून वाचवण्यासाठी शेतकरी शेडमध्ये पंखे आणि पाण्याचे तुषार उडवणारी यंत्रे बसवण्यात आली आहेत. तसेच शेडच्या छतावर पाण्याचा शिडकावा करून किंवा त्यावर पेंढा आणि गोणपाटाचा थर देऊन आतील तापमान कमी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र, वीज कपात आणि पाण्याचे वाढते दुर्भीक्ष्य यामुळे या उपाययोजना राबवतानाही शेतकऱ्यांना कसरत करावी लागत आहे.