निपाणी : गौतम बुद्धांचे विचार देशाला तारणारे आहेत. मात्र, काही मनुवादी प्रवृत्तींकडून या विचारांना गाडण्याचा प्रयत्न झाला. त्या सर्व प्रवाहांना छेद देत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्धांचे तत्त्वज्ञान नव्याने समाजासमोर उभे केले. त्यामुळे धम्माच्या माध्यमातून बाबासाहेबांना अभिप्रेत असलेला बुद्ध समाजात रुजविणे हीच खरी कृतज्ञता ठरेल, असे प्रतिपादन सुप्रसिद्ध व्याख्याते तथा ‘जग बदलणारा बाप मनुष्य’ या पुस्तकाचे लेखक जगदीश ओहाळ (पुणे) यांनी केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर शताब्दी महोत्सव समिती व भारतीय बौद्ध महासभा, निपाणी यांच्या संयुक्त विद्यमाने मराठा मंडळ सांस्कृतिक भवन येथे आयोजित तिसऱ्या बौद्ध धम्म परिषदेत ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी भारतीय बौद्ध महासभा उत्तर कर्नाटकचे मनोहर मोरे होते. ता.प.चे कार्यनिर्वाहक प्रवीण कट्टी यांच्या हस्ते जातीव्यवस्थेची उतरंड दर्शविणारे मडके फोडून परिषदेचे उद्घाटन करण्यात आले.
ओहाळ म्हणाले, सम्राट अशोक व डॉ. बाबासाहेब आंबेडकर या दोन महापुरुषांनी बुद्धांचा विचार जिवंत ठेवण्याचे ऐतिहासिक कार्य केले. आज देशात जाती-धर्माच्या नावाने राजकारण होत असून समाजात फूट पाडली जात आहे. हे चित्र बदलण्यासाठी गावागावांत बाबासाहेबांचे विचार जागविणारे अनुयायी तयार झाले पाहिजेत.
भंते ज्ञानज्योती (बेळगाव) व भंते नवापाल करुणा (भालकी) यांनी बुद्ध वंदना सादर केली. स्वागत राहुल शितोळे यांनी केले. धम्म परिषद समितीचे अध्यक्ष सुधाकर माने म्हणाले, निपाणी ही आंबेडकरी चळवळीचे महत्त्वाचे केंद्र राहिले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा तब्बल आठ वेळा या भूमीला पदस्पर्श झाला आहे. धम्माचा प्रचार-प्रसार आणि नव्या पिढीपर्यंत समतेचा संदेश पोहोचविण्यासाठी ही परिषद आयोजित केली आहे. भंते नवापाल भालकी यांनी धम्म म्हणजे केवळ श्रद्धा नसून आचरण आहे, असे स्पष्ट केले. .
प्रा. डॉ. अच्युत माने यांनी धम्म म्हणजे जगण्याची शिस्तबद्ध पद्धत असून तो समाजाच्या सुख-सन्मानाचा मार्ग असल्याचे सांगितले. जग युद्धाच्या उंबरठ्यावर उभे असताना शांतीचा मार्ग दाखवणारे गौतम बुद्धच आहेत. असे सांगत धर्म आणि संविधान या दोन शक्तींच्या आधाराने कार्यरत राहण्याचे आवाहन केले. अध्यक्षीय भाषणात मनोहर मोरे यांनी धम्म परिषद ही समाजप्रबोधनाची प्रभावी चळवळ असल्याचे सांगून विविध ठराव मांडले. राष्ट्रीय संघटक मल्लिकार्जुन भालके यांनीही मनोगत व्यक्त केले.
परिषदेस भंते करूनानंद (इचलकरंजी) परशुराम कर्निंग, अरविंद घटी, अशोककुमार असोदे, राजेंद्र वडर, प्रा. जे. डी. कांबळे, मल्लेश चौगुले, प्रा. डॉ. आर. के. दिवाकर, लता नडोणी, कबीर वराळे, प्रा. नामदेव मधाळे, नानासाहेब जामदार, चंद्रकांत खराडे, उस्मानगणी पटेल, यशवंत सम्राट, रावसाहेब देवरमणी, स्मिता कडोळकर, शोभा झिंजारे, विक्रम शिंगाडे, स्मिता कडोले, कपिल कांबळे, प्रा. अजित कांबळे, यमनापा गडीनाईक, उदय वंटे, राहुल शितोळे, संतोष मेस्री, सुशील कांबळे, अविनाश माने, किसन दावणे, आरेश सनदी, गोरखनाथ मधाळे, सुनील कांबळे आदी उपस्थित होते.