बेळगाव : राज्यासमोर सध्या दोनच आव्हाने मोठी आहेत. एक राज्यात फोफावत असलेला अमली पदार्थाचा विळखा कमी करणे आणि दुसरे म्हणजे सायबर फसवणुकीवर नियंत्रण आणणे. यासाठी प्रत्येक पोलिस कॉन्स्टेबलला सायबर एक्स्पर्ट बनविणार आहे. यासाठी राज्यातील 15 हजार पोलिसांना पहिल्या टप्प्यातील प्रशिक्षण सुरू झाले आहे, असे गृहमंत्री डॉ. जी. परमेश्वर यांनी सांगितले.
पोलिस वसतिगृहांसह विविध बांधकाम
शंकूस्थापनेसाठी शुक्रवारी गृहमंत्री बेळगावात आले होते. त्यावेळी त्यांनी राज्यातील पोलिस प्रतिमा कशी उंचावली आहे, हे पत्रकारांना सांगताना पोलिस खात्यासमोरील आव्हानेदेखील सांगितली. राज्यातील पोलिस यंत्रणा चांगले काम करत आहे. काही चुका त्यांच्याकडूनही होत आहेत. परंतु, आव्हानात्मक काम पोलिसांकडून केले जात आहे.
सध्या राज्यासमोर दोन मोठी आव्हाने आहेत. यातील एक म्हणजे आजची तरुणाई अमली पदार्थाच्या विळख्यात सापडत आहे. पालक आपला मुलगा शिकतो आहे म्हणून दुर्लक्ष करतात. परंतु, त्यांचा मुलगा जर व्यसनाच्या विळख्यात सापडला तर असे संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त होते. आधी मुलाच्या करिअरचे टेन्शन अन् मुलगा व्यसनाधीन बनला तर त्याचे, असा पालकांना दुहेरी मन:स्ताप सहन करावा लागतो. अशातच बंगळूरमध्ये मोठ्या प्रमाणात अमली पदार्थाची आवक होत आहे. त्यानंतर याचे जाळे राज्यभर पसरवले जाते. गुरूवारीच बंगळुरात 24 कोटींचे अमली पदार्थ सापडले आहेत.
आतापर्यंत हजारो कोटींचे अमली पदार्थ नष्ट केले आहे. ते जर केले नसते तर किती तरुणांचे भविष्य उद्ध्वस्त झाले असते, याचा विचार करण्याची आज गरज आहे. परंतु, हे अमली पदार्थ नेमके कोठून येते, याचा शोध घेण्यासाठी पोलिस यंत्रणा सक्रिय केली आहे. ते परराज्यातून, परदेशातून पार्सलद्वारेदेखील येत आहे. त्याचा बंदोबस्त करण्याचे आव्हान पोलिसांसमोर असल्याचे त्यांनी सांगितले.
दुसरे आव्हान हे सायबर क्राईमचे आहे. डिजिटल अरेस्ट, ओटीपीच्या नावाखाली फसवणूक सुरू आहे. विशेषतः ज्येष्ठ व निवृत्त व्यक्तींची बँक खाती हे सायबर भामटे रिकामी करत आहेत. त्यामुळे आपला प्रत्येक पोलीस सायबर एक्स्पर्ट झाला पाहिजे, यासाठी आपले प्रयत्न सुरू आहेत. प्रत्येक जिल्ह्याच्या पोलिस प्रमुखांना सूचना केली आहे की, कॉन्स्टेबलपासून प्रत्येक अधिकाऱ्याला सायबर एक्स्पर्ट बनवा, त्यासाठी आवश्यक ते प्रशिक्षण द्या, जेणेकरून तो जाईल तेथे याबाबत जनजागृती करेल.