बंगळूर : यंदाच्या वर्षाखेरपर्यंत ग्राम पंचायत निवडणुका घेण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे ग्रामविकास व पंचायत राज मंत्री प्रियांक खर्गे यांनी दिली. ते शनिवारी (दि. ९) गुलबर्ग्यात पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, ग्राम पंचायत सीमांसंदर्भात आक्षेप नोंदविण्याचा शेवटचा दिवस उलटून गेला असून लवकरच निवडणुका होणार आहेत. यानंतर तालुका पंचायत आणि जिल्हा पंचायत निवडणुकाही होणार आहेत, असे त्यांनी सांगितले.
जिल्ह्यात पाण्यासाठी निधीची कमतरता नाही. पाणीटंचाई असलेल्या २१ गावांमध्ये नवीन बोअरवेल खोदण्यात आल्या आहेत. या भागातील चार गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. प्रत्येक जिल्ह्याला ५ कोटी रुपयांचे अनुदान देण्यात आले आहे. हा निधी खर्च झाल्यास अधिक निधी दिला जाईल. केकेआरडीबी मंडळाकडून १७.३० कोटी रुपयांचे अनुदानही देण्यात आले आहे. आमदारांच्या नेतृत्वाखाली एक कार्यदल स्थापन करण्यात आले असून आमदारांच्या निर्णयानुसार पिण्याच्या पाण्याची कामे केली जातील, असे ते म्हणाले.
तसेच एम. वाय. पाटील यांनी बी. आर. पाटील यांच्यासमवेत उन्हाळ्यात या जिल्ह्यातील पिण्याच्या पाण्याच्या समस्येसंदर्भात उपमुख्यमंत्री आणि जलसंपदा मंत्री डी. के. शिवकुमार यांची यापूर्वीच भेट घेतली असून, महाराष्ट्रातील भीमा नदीतून पिण्याचे पाणी सोडण्याची मागणी केली असल्याचे सांगितले.