बेळगाव : गणपती मूर्तीची आगमन मिरवणूक संपवून सोमवारी रात्री उशिरा घरी परतणाऱ्या युवकांच्या दुचाकीला बसने उडवल्याने तीन युवक मृत्युमुखी पडले. सौंदत्ती-धारवाड मार्गावर हा अपघात झाला.
विनोद जोगेन्नावर (वय २२), आकाश जाधव (२०) आणि रवी कुंभार (२२, तिघे रा. सौंदत्ती) अशी मृतांची नावे आहेत. अपघात इतका भीषण होता की, दुचाकीचा चक्काचूर झाला. बस बसवकल्याणहून सौंदत्तीमार्गे हुबळीला जात होती. तिन्ही युवक एकाच दुचाकीवरून धारवाडहून सौंदत्तीला परतत होते. ते धारवाडला गणपती आगमन मिरवणूक पाहण्यासाठी गेले होते. मिरवणूक रात्री उशिरा संपल्यानंतर ते घरी परतत होते.
सौंदत्ती-धारवाड मार्गावर सौंदत्तीजवळच्या एका अवघड वळणावर बसने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. डोक्याला मार लागल्याने तिघांचाही जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच सौंदत्ती पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून दुचाकी आणि बस ताब्यात घेण्यात आली. मृतदेह विच्छेदनासाठी रुग्णालयात हलविण्यात आले. सौंदत्ती पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, तपास सुरू आहे.