बेळगाव : भारतनगर, शहापूर येथे झालेल्या चोरीत तब्बल 80 तोळे सोन्याचे दागिने चोरीला गेले असून याची किंमत पोलिसांनी 64 लाख नोंदवून घेतली आहे. परंतु, सध्याच्या बाजारभावानुसार ही रक्कम सव्वाकोटींच्या घरात जाते. चोरट्यांनी पंधरा प्रकारचे दागिने नेल्याचेही पोलिस दप्तरी नोंद आहे.
आठवडाभरापासून बंद असलेले भारतनगर, शहापूर येथील घर चोरट्यांनी फोडले. याप्रकरणी कल्पना मुरलीधर काटवा (रा. लक्ष्मी गल्ली, भारतनगर शहापूर) यांनी गुरूवारी रात्री शहापूर पोलिसांत फिर्याद दिली. यामध्ये जादा सोने चोरीला गेल्याचे त्यांनी सांगितले. परंतु, नेमके किती सोने चोरीला गेले, याची रात्री उशिरापर्यंत त्यांनाही मोजदाद करता आली नाही. त्यामुळे याची फिर्याद नोंदवण्यास उशीर झाला.
महिला अस्वस्थ
आपल्या घरातील सर्वच दागिने चोरून नेल्याचा धक्का सदर महिलेला सहन झाला नाही. त्यामुळे पोलिस ठाण्यात फिर्याद देण्यासाठी आल्या तेव्हा त्या अत्यवस्थ बनल्या. त्यांना तातडीने रूग्णालयात नेण्यात आले. त्यांना बरे वाटल्यानंतर रात्री उशिरा ठाण्यात बोलावून त्यांच्याकडून फिर्याद घेण्यात आली.
जादा दागिने चोरीला गेल्याने घटनेची माहिती मिळताच व कायदा व सुव्यवस्था विभागाचे डीसीपी एन. व्ही. बरमणी, वाहतूक व गुन्हे विभागाचे डीसीपी निरंजनराजे अर्स, खडेबाजारचे एसीपी शेखराप्पा एच., शहापूरचे निरीक्षक एस. एस. सीमानी यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.