बेळगाव : नैऋत्य रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा दलाने (आरपीएफ) ऑगस्ट महिन्यात सहा मुलींसह ३३ मुलांची सुटका केली. तर सुमारे १२.५ कोटी रुपये किमतीची तस्करी जप्त केली आहे.
ऑपरेशन नन्हे फरिस्ते अंतर्गत आरपीएफने देखभाल व संरक्षणाची गरज असलेल्या २७ मुले आणि सहा मुलींची सुटका केली. पुढील मदतीसाठी व त्यांच्या कुटुंबियांशी पुनर्मिलन घडवून आणण्यासाठी त्यांना स्वयंसेवी संस्था आणि पोलिसांच्या ताब्यात दिले. ऑपरेशन डिग्निटींतर्गत दोन पुरुषांसह चार वृद्ध व्यक्तींचीही सुटका करण्यात आली. काळ्या बाजारात रेल्वे तिकिटांच्या विक्रीला आळा घालण्याच्या उद्देशाने सुरुअसलेल्या ऑपरेशन उपलब्धअंतर्गत, आरपीएफने रेल्वे कायद्याच्या कलम १४३ अन्वये १२ प्रकरणांमध्ये १२ दलालांना अटक केली. त्यांच्याकडून ५३,००१ रुपये किमतीची १८ वैध तिकिटे आणि २.३२ लाख रुपये किमतीची ५६ वापरलेली तिकिटे जप्त करण्यात आली.
ऑपरेशन सतर्क अंतर्गत आरपीएफने मद्याशी संबंधित आठ प्रकरणे उघडकीस आणली आणि ५५,१६२ किंमतीच्या एकूण ८९ लिटरच्या १५४ बाटल्या जप्त केल्या. ऑपरेशन नार्कोस अंतर्गत आठ प्रकरणांमध्ये १२७.५ किलो गांजा जप्त करण्यात आला, ज्यामध्ये एका प्रकरणात ११.९८ कोटी रुपये किमतीच्या १४.९८ किलो अॅम्फेटामाइनचा समावेश आहे. या प्रकरणात तिघांना अटक करण्यात आली. अमली पदार्थांशी संबंधित प्रकरणांमध्ये सहाजणांना अटक करण्यात आली. आरपीएफने ६७ वेळा प्रवाशांचा ६६.४१ लाख रुपयांचा सामान हस्तगत करून तो त्यांच्या मालकांना परत केला.
तीव्र कारवाई
नैऋत्य विभागात भारतीय रेल्वेच्या रोज सरासरी ३६ ते ४० एक्सप्रेस आणि विशेष गाड्यांना १२५ हून अधिक आरपीएफ जवानांकडून संरक्षण दिले जाते. याव्यतिरिक्त, रेल्वे मालमत्तेचा बेकायदेशीर ताबा घेतल्याच्या १४ प्रकरणांमध्ये २४ जणांना अटक करण्यात आली असून, २.२८ लाख रुपयांची चोरीची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.
राज्यभरात जोर
बालमजुरीविरोधात राज्य सरकारने कडक पावले उचलण्यास सुरवात केली आहे. दोन दिवसांत बंगळुरात हजारहून अधिक बालमजुरांची सुटका केली आहे. तर राज्यात इतर ठिकाणीही छापे टाकून कारवाई करण्यात येत आहे. बेळगाव जिल्हाधिकाऱ्यांनी महिला व बाल विकास खात्याच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन कारवाईच्या सूचना केल्या आहेत.