बंगळूर : पुढारी वृत्तसेवा
जिल्ह्याचे विभाजन होणे आवश्यक आहे. भौगोलिकदृष्ट्या मोठा जिल्हा आणि वाढती लोकसंख्या यामुळे व्यवस्थापनावर परिणाम होत आहे. जिल्ह्याचा विकास होण्यासाठीच जिल्ह्याचे विभाजन आवश्यक असल्याचे महिला व बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी सांगितले. येथे पत्रकारांशी त्या बोलत होत्या.
मंत्री हेब्बाळकर म्हणाल्या, दसरोत्सव झाल्यानंतर जिल्ह्यातील सर्व आमदारांची बैठक घेऊन जिल्हा पालकमंत्र्यांसोबत चर्चा करण्यात येणार आहे. त्यानंतर मुख्यमंत्री सिद्धरामय्या व महसूल मंत्री कृष्ण बैरेगौडा यांना पत्र पाठवण्यात येणार आहे. बेळगाव जिल्हा भौगोलिकदृष्ट्या मोठा असून लोकसंख्याही अधिक आहे. शहर व ग्रामीण भागाचे व्यवस्थापन करण्यासाठी जिल्ह्याचे विभाजन करणे आवश्यक आहे.
मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वाखाली सरकारचा कारभार सुरळीत सुरू आहे. आम्ही बसवेश्वरांच्या तत्त्वावरचालत आहोत. सर्वधर्मसमभाव असे म्हणणारे यत्नाळ हे द्वेषाचे राजकारण करत आहेत. गोरगरिबांच्या खात्यात पैसे जात असल्याने ते टीका करत आहेत. मात्र, गोरगरिबांची आर्थिक परिस्थिती सुधारली आहे. त्यांना आर्थिक आधार मिळाला आहे. मात्र, जे आरोप करत आहेत त्यांचे पुढील राजकीय भविष्य धोक्यात असल्याचेही त्यांनी सांगितले.
पंचमसाली समाजाच्या पाठीशी आमचे सरकार आहे. त्यांना आरक्षण मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. आम्ही सदैव त्यांच्या पाठीशी असल्याचे मंत्री हेब्बाळकर यांनी सांगितले.