बेळगाव : देवासमोर हात जोडले की बहुतांश भाविक सुख, समृद्धी, आरोग्य याची याचना करतो. अनेक जण तर हजारो रुपये खर्च करून दूरदूरच्या देवस्थानांत जाऊन याचना करत असतात. पण, देवा मला त्या मुलीपासून वाचव, अशी याचना करणारे पत्र सध्या सोशल मीडीयावर व्हायरल झाले असून रामदुर्ग तालुक्यातील पडकोटगल्ली या गावातील राघवेंद्र स्वामी मठाच्या दानपेटीत ते सापडले आहे. त्यामुळे हा चर्चेचा विषय बनला आहे.
अलीकडे मुलांची वेळेवर लग्न होत नाहीत. वय निघून जात असून वधूशोध काही थांबत नाही. त्यामुळे अशा विवाहेच्छुकांकडून देवा माझे लवकर लग्न होवू दे, अशी मागणी करतही देवाला साकडे घालण्याचे प्रकार समोर आहेत. पण, त्या मुलीपासून मला वाचव, त्या दुखःतून मला वाचव, अशी याचना भाविकाकडून का करण्यात आली आहे, असा सवाल अनेकांच्या मनात आहे.
राघवेंद्र स्वामी मठात नुकत्याच झालेल्या दानपेटीतील पैसे, दागिण्यांच्या मोजणीच्या वेळी एका भक्ताने राघवेंद्र स्वामींना कन्नड भाषेत पत्र लिहिले आहे. या पत्रात एका अज्ञात व्यक्तीने, "स्वामी, मला त्या मुलीपासून वाचवा, मला त्या विषापासून वाचवा, मला त्या कष्टापासून वाचवा" अशी भावनिक विनंती केल्याचे आढळून आले आहे.
पत्र लिहिणाऱ्या व्यक्तीचे नाव, पत्ता किंवा इतर कोणतीही माहिती त्यात नमूद केलेली नाही. त्यामुळे, हे पत्र कोणी लिहिले आहे हे कळलेले नाही. या विनंती पत्राने मठातील कर्मचारी आणि भक्तांना आश्चर्यचकित केले असून ते सोशल मीडियावरही चर्चेचा विषय बनले आहे. सर्वसाधारणपणे, आरोग्य, रोजगार, शिक्षण, विवाह यासारख्या विविध समस्यांवर उपाय मागण्यासाठी देवाला पत्र लिहून ते हुंडीत टाकणे हे भक्तांसाठी नवीन नाही. पण "मुलीपासून वाचवा" असे थेट आवाहन करणाऱ्या या पत्राने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.