अंकली : राज्यात अनेक दिवसांपासून खासगी आर्थिक संस्था कडून घेतलेले कर्ज फेडण्यासाठी अनेक नागरिकांनी आपली संपत्ती विकून कर्ज भागवले आहे. इतकेच नव्हे तर कर्ज भागवताना स्वतःचा जीव ही गमावून बसले आहेत. रायबाग तालुक्यातील अलखनूर गावात अशीच घटना घडली आहे.
येथील एका व्यक्तीने वडिलांच्या आजारपणासाठी खासगी आर्थिक संस्थेला आपले घर तारण ठेवून कर्ज घेतले होते. त्याने घेतलेले कर्ज फेडण्यासाठी विलंब झाल्यामुळे बेळगाव व चिकोडी येथे कार्यरत असलेल्या त्या फायनान्स कंपनीने कर्जदाराच्या घराला कुलूप लावून घरातील तीन महिन्यांच्या बाळंतिणीसह सर्वांना घराबाहेर काढले. चिमुकल्या बाळाला घेऊन सदर माता व इतर सदस्य दारातच अन्न व पाण्याविना बसून राहिले आहेत.
याबाबत समजलेली माहिती अशी की, अलखनूर येथील श्रीनिवास पाटील यांनी आपल्या वडिलांच्या औषधोपचारासाठी व रुग्णालयाच्या खर्चासाठी सदर फायनान्स कंपनीकडून 50 हजार रुपये कर्ज घर तारण ठेवून घेतले होते.
मात्र, उपचार सुरू असतानाच वडिलांचा मृत्यू झाल्याने सदर फायनान्सकडून घेतलेले कर्ज फेडण्यासाठी विलंब झाला. त्यामुळे त्या फायनान्स कंपनीने शनिवारी घरातील सर्व सदस्यांबरोबरच श्रीनिवास पाटील यांच्या पत्नीला व तिच्या तीन महिन्यांच्या बाळालाही घरातील कोणतीही सामग्री न घेता बाहेर काढून घराला सील केले. सदर घटनाही हारूगेरी पोलिस स्थानकाच्या व्याप्तीत घडली असून याप्रकरणी पोलिस स्थानकात नोंद झाली नसल्याचेे सांगण्यात आले आहे.