बेळगाव : करीकट्टी गावाने शिक्षण क्षेत्रात कौतुकास्पद पायंडा पाडला आहे. या गावात एखाद्या कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तीचे निधन झाल्यास केवळ दुःख न करता किंवा केवळ पारंपरिक विधी न करता, त्यांच्या स्मृती चिरंतन ठेवण्यासाठी ग्रामस्थांकडून थेट सरकारी शाळांमध्ये शैक्षणिक गुंतवणूक केली जाते. गेल्या चार दशकांपासून सुरु असलेल्या या अनोख्या परंपरेमुळे गावातील सरकारी शाळांसाठी तब्बल १३ लाख रुपयांचा निधी जमा झाला आहे.
गावातील सरकारी मॉडेल प्राथमिक शाळा आणि सरकारी हायस्कूल या शाळांना बळकट करण्यासाठी ही मोहीम राबवली जात आहे. अंत्यविधीच्या वेळी किंवा कुटुंबातील कोणत्याही शुभप्रसंगी कुटुंबियांतर्फे जाहीरपणे शाळेला देणगी देण्याची घोषणा केली जाते. ही सर्व रक्कम राष्ट्रीयीकृत बँकेत संबंधित मुख्याध्यापकांच्या नावाने 'मुदत ठेव' म्हणून ठेवली जाते. या मुदत ठेवींवर मिळणाऱ्या वार्षिक व्याजाचा वापर केवळ आणि केवळ प्रत्येक वर्गातील गुणवंत विद्यार्थ्यांना वार्षिक स्नेहसंमेलनात रोख पारितोषिके व शिष्यवृत्ती देण्यासाठी केला जातो. या पैशांचा वापर शाळेच्या पायाभूत सुविधांसाठी केला जात नाही,
या परंपरेची पायाभरणी १९८६ मध्ये माजी शिक्षक एम. सी. पाटील यांनी पहिली मुदत ठेव ठेवून केली होती. १९९४ मध्ये स्थापन झालेल्या हायस्कूलसाठी १९९६ मध्ये वीरभद्र जकाती यांनी पहिली १,००० रुपयांची ठेव ठेवली. आज हायस्कूलकडे ५.६० लाख रुपयांची ठेव जमा झाली आहे. या उपक्रमात गावातील आजी-माजी विद्यार्थ्यांचा मोठा वाटा आहे. डॉ. ज्योती जीवण्णावर यांनी आपल्या वडिलांच्या स्मरणार्थ शाळांना १.२३ लाख रुपयांचा 'स्मार्ट बोर्ड' भेट दिला आहे. तसेच सिंगापूर येथे स्थायिक असलेले गावचे सुपुत्र उमेश बळी यांनी दहावी परीक्षेत प्रथम येणाऱ्या तीन विद्यार्थ्यांना दरवर्षी १०,००० रुपयांचे रोख बक्षीस देण्याची व्यवस्था केली आहे. १८५७ मध्ये स्थापन झालेल्या प्राथमिक शाळेत आज ४२० विद्यार्थी, तर हायस्कूलमध्ये ३५३ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.