बेळगाव : येथील कपिलेश्वर तलावात गत १३ वर्षांमध्ये १६ जणांचा बुडून मृत्यू झाला असून यापैकी १४ प्रकरणांची नोंद पोलिस दप्तरी आहे. त्यामुळे, कपिलेश्वर तलावात पोहण्यास अथवा येथे फिरण्यास बंदी घातल्याचा आदेश पोलिस आयुक्त भूषण बोरसे यांनी बजावला आहे.
कपिलेश्वर तलावात बुडून दोन भावांचा बळी गेल्याची घटना ३ मे रोजी घडली होती. त्यामुळे, पोलिस आयुक्तांनी ही बाब अत्यंत गांभीर्याने घेतली आहे. याच दिवशी सायंकाळी पोलिसांनी येथे बॅरिकेडस् लावून तलावात प्रवेशबंदी केली आहे. शिवाय येथील काही घरेही बंद केली आहेत. गेल्या काही वर्षांमध्ये तलावात घडलेल्या अघटित घटनांचा तपशील त्यांनी खडेबाजार पोलिसांकडून मागवून घेतला असता त्यात धक्कादायक माहिती समोर आली आहे.
२०१३ ते २०२६ या काळात या तलावात बुडून १६ जणांचा मृत्यू झाला आहे. यापैकी १४ प्रकरणांची पोलिसांत नोंदही आहे. याचा अर्थ या तलावाजवळ कोणतीही उपाययोजना केलेली नाही, हे लक्षात येते. त्यामुळे, बेळगावकरांना येथे मुक्त फिरण्यावर निर्बंध घालण्याची गरज होती. यासाठी पोलिस आयुक्तांनी खडेबाजार पोलिसांकडून अहवाल मागवून घेतला आहे.
या प्रकरणी खडेबाजार पोलिसांनी ६ मे रोजी पोलीस आयुक्तांना पत्र लिहिले आहे. त्यात त्यांनी या तलावाचा सविस्तर अहवाल आयुक्तांना पाठवला आहे. त्याची दखल घेत अतिरिक्त जिल्हा दंडाधिकारी तथा पोलिस आयुक्त भूषण बोरसे यांनी महत्वाचा आदेश बजावला आहे.