बेळगाव : दीड वर्षांपूर्वी मंदिरफोड्यांनी घातलेल्या धुमाकुळानंतर आता सावगावमधील कलमेश्र्वर मंदिर फोडण्यात आले असून, चोरट्यांनी मंदिरातील तब्बल ५१ किलो वजनाचा पंचधातूचा मुखवटा चोरून नेला आहे. त्याचबरोबर २५ किलो वजनाची पितळी समई, महाप्रसादाची भांडीही चोरट्यांनी लंपास केली आहेत. त्यामुळे चोरट्यांची टोळीच असल्याचे स्पष्ट झाले आहे.
गुरुवारी सकाळी सावगावमधील कलमेश्वर मंदिरात चोरी झाल्याचे उघडकीस आले. पुजारी नेहमीप्रमाणे पूजेसाठी आल्यानंतर त्याला हा प्रकार दिसला. चोरट्यांनी लोखंडी ग्रीलचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. मंदिरातील गाभाऱ्यात असलेला पंचधातूचा ५१ किलोचा मुखवटा, छताला टांगलेली २५ किलोची पितळेची घंटा, समई, ॲम्प्लीफायर, महाप्रसादाची भांडी, मृदंग आणि टाळही चोरट्यांनी पळवले आहेत.
घटनेची माहिती बेळगाव ग्रामीण पोलिसांना कळवल्यानंतर उपनिरीक्षक संतोष दळवाई व सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. कोणावर संशय आहे का, अशी पंच मंडळी तसेच ग्रामस्थांकडे विचारणा केली. घटनास्थळी श्वानपथक व ठसेतज्ज्ञांनाही पाचारण करण्यात आले. चोरट्यांचा माग काढण्याचा प्रयत्न झाला. परंतु, यश आले नाही. रात्री उशिरा चोरीची नोंद करण्यात आली असून, तपास सुरू आहे.