बेळगाव : तालुक्यातील गौंडवाड गावात कोबीची लागवड मोठ्या प्रमाणात करण्यात येते. येथील शेतकरी यल्लाप्पा पाटील यांनी 120 पोती कोबीची तोडणी केली. मात्र, एपीएमसीत केवळ 2 रुपये प्रतिकिलो दर मिळाला. त्यामुळे विक्रीतून वाहतूक खर्चदेखील निघाला नाही.
तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांबाबत अशीच स्थिती झाली आहे. दराअभावी कोबी उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले आहेत. यामुळे शेतकरी कोबी पिकावर ट्रॅक़्टर चालवत आहेत. पिकात बकरी सोडत आहेत. शेतातील भाजी तोडणी करुन विक्री करण्याइतपतही दर मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत. पंधरा दिवसांपूर्वी कडोली येथील शेतकऱ्याने दोन एकर कोबी पिकांवर ट्रॅक्टर चालवला. शेतातील पिकाची तोडणी करुन बाजारात नेण्याचा खर्चही विक्रीतून निघत नसल्याने शेतकऱ्याने निर्णय घेतला. हिंडलगा येथील शेतकऱ्याने तोडणी आणि वाहतूक खर्च टाळण्यासाठी चक्क पिकात बकरी सोडली. यातून कोबी उत्पादक शेतकऱ्यांची व्यथा अधोरेखित होत आहे.
बेळगाव तालुक्यात खरीप हंगामानंतर मोठ्या प्रमाणात भाजी लागवड करण्यात येते. रब्बी हंगामात कोबी, फ्लॉवर, बटाटा, मिरची अशी पिके घेण्यात येतात. मात्र, यावर्षी दरांमध्ये मोठ्या प्रमाणात घसरण झाल्याने शेतकरी हतबल बनले आहेत. शेतकऱ्यांना लाखो रुपयांचा फटका बसला आहे. परिणामी शेतातून भाजी पडून आहे.
प्रामुख्याने कोबी उत्पादक शेतकऱ्यांना याचा फटका बसला आहे. मध्यंतरी कोबीला प्रतिकिलो केवळ एक रुपया इतका दर देण्यात आला. यानंतर सध्या प्रतिकिलो दोन रुपये इतका दर झाला आहे. सध्या वाहतुकीचा खर्च प्रत्येक पोत्याला किमान 30 ते 50 रुपये आहे. पिशवीचा खर्च 40 रुपयांपर्यंत आहे. एका पोत्याच्या विक्रीतून शेतकऱ्यांना शेतकऱ्याला किमान 50 रुपयाचे आर्थिक नुकसान सोसावे लागत आहे. भाजी लागवडीसाठी करण्यात आलेला हजारो रुपयांचा फटका सहन करावा लागत आहे. परिणामी शेतकरी कर्जबाजारी बनला आहे.