बेळगाव : एकीकडे पावसाअभावी शेतकरी हैराण झाले आहेत. दुसरीकडे रासायनिक खत विक्रीच्या नावाखाली काही प्राथमिक कृषी पत्तीन संस्थांकडून शेतकऱ्यांची लूट करण्यात येत आहे. डीएपीसाठी प्रत्येक पोत्याला १,५०० रुपये उकळण्यात येत आहेत.
इराण व इस्रायल-अमेरिका युद्धामुळे यंदा रासायनिक खतांच्या दरात भरमसाठ वाढ करण्यात आली आहे. त्याचबरोबर युरिया, डीएपीसारख्या रासायनिक खतांचा तुटवडा निर्माण झाला आहे. यामुळे सामान्य शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. खतांच्या दरात सुमारे ५०० ते ६०० रुपये इतकी वाढ झाली आहे. कृषी खात्याने शेतकऱ्यांना रासायनिक खते, बियाणे स्थानिक पातळीवर उपलब्ध व्हावीत, यासाठी कृषी पतीन संस्थांमध्ये विक्रीसाठी खते ठेवली आहेत. यंदा खते मिळविण्यासाठी शेतकऱ्यांना एफआयडी बंधनकारक करण्यात येत आहे. आधार कार्ड आवश्यक करण्यात आले आहे.
रासायनिक खत खरेदी केल्यानंतर शेतकऱ्यांच्या मोबाईलवर खत खरेदी केलेल्या दराचा मेसेज येत आहे. यामध्ये डीएपीसाठी १,३५० रुपये दर नोंदविण्यात येत आहे. परंतु, प्रत्यक्षात प्राथमिक कृषी पतीन संस्थांकडून १,५०० रुपये उकळण्यात येत आहे. यातून शेतकऱ्यांची थेट १५० रुपये प्रत्येक पोत्याला फसवणूक करण्यात येत आहे. यामुळे शेतकरी हैराण झाले आहेत.