बेळगाव : राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अतिरिक्त आयुक्त डॉ. वाय. मंजुनाथ यांच्यावरील ईडीचा छापा सध्या तरी राजकीय हेतूने प्रेरित नाही; याचे सत्य सहा महिन्यांनंतरच समोर येईल, असे सार्वजनिक बांधकाम तथा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी शुक्रवारी (दि. २६) पत्रकारांना सांगितले.
शहरातील काँग्रेस भवनात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना मंत्री जारकिहोळी म्हणाले, बेळगाव जिल्हा उत्पादन शुल्क विभागाचे उपायुक्त वाय. मंजुनाथ यांच्या निवासस्थानी अंमलबजावणी संचालनालयाच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकला, ही वस्तुस्थिती आहे. ते आमचे नातेवाईकही आहेत. परंतु, सध्याच्या परिस्थितीत या छाप्याला राजकीय हेतूने प्रेरित म्हणता येणार नाही.
राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अतिरिक्त आयुक्त मंजुनाथ यांच्यावर ईडीने इतक्या मोठ्या प्रमाणावर छापा टाकण्याची ही पहिलीच वेळ आहे. या घडामोडीमुळे आम्हालाही चिंता वाटत आहे. यापूर्वी २०११ मध्ये त्यांच्यावर एक गुन्हा दाखल झाला होता, परंतु तो आधीच रद्द करण्यात आला आहे. सध्याच्या छाप्यासंदर्भात अधिकारी कोणते प्रश्न विचारतात आणि त्यांना काय माहिती मिळते, हे पाहण्यासाठी आम्हाला वाट पाहावी लागेल. आपण आज मंजुनाथ यांच्याशीही चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
ईडीच्या छाप्यामागील राजकीय पैलूंवर बोलताना मंत्री जारकिहोळी यांनी, आम्हाला राजकीयदृष्ट्या अडचणीत आणण्यासाठी हा छापा टाकला जात आहे का, हे सध्या तरी माहीत नाही. यासाठी किमान सहा महिने लागतील. सध्या तरी काहीच सांगता येणार नाही. सहसा, निवडणुका जवळ येतात तेव्हा अशा प्रकारचे ईडीचे छापे सुरू होतात. यावेळी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष विनय नावलगट्टी, सुनील हम्मण्णावर, सिद्धू सुणगार व इतर उपस्थित होते.