राकसकोप : मंगळवारी रात्री व बुधवारी दिवसभर संततधार पाऊस पडल्याने राकसकोप जलाशय तुडुंब झाले आहे. पूर्ण क्षमतेने जलाशय भरण्यासाठी अजून दीड फूट पाण्याची आवश्यकता आहे. मात्र, खबरदारी म्हणून दोन दरवाजे थोडेसे खुले करून चार इंचाने विसर्ग सुरू करण्यात आला आहे. जलाशयाचे दोन आणि पाच नंबरचे दरवाजे उचलण्यात आले आहेत.
बुधवारी जलाशयाची पाणी पातळी २,४७३.८० फुटांवर पोहोचली. गतवर्षी याच दिवशी जलाशयाची पाणी पातळी २,४७५.५० फूट होती. चार दिवस सातत्याने जलाशयाच्या पाणी पातळीत वाढ होत गेली. गुरुवारी अथवा शुक्रवारी राकसकोप जलाशय तुडुंब होण्याची शक्यता वर्तवली जात होती. बुधवारी पाणीपुरवठा मंडळाने पाणी पातळी २,४७३.८० फुटांवर पोहोचल्यानंतर सायंकाळी पाच वाजता जलाशयाचा दरवाजा क्रमांक दोन आणि पाच चारइंचाने उचलण्याचा निर्णय घेतला. त्याप्रमाणे पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. त्यामुळे मार्कंडेय नदीला पूर येण्याची शक्यता असून शेतकऱ्यांना सतर्क राहावे लागणार आहे.
१३८३ मि.मी. पाऊस
राकसकोप जलाशय परिसरात बुधवारी सकाळी सरासरी १३६८.३ मि.मी. पावसाची नोंद झाली. गतवर्षी ७ जुलैला जलाशय तुडुंब झाले होते. यावर्षी पावसाने उशिरा हजेरी लावूनदेखील या महिन्यातच जलाशय तुडुंब झाले आहे.
मणूर पंपिंग स्टेशनमध्ये दक्षता
राकसकोप जलाशयातून पाण्याचा विसर्ग सुरू झाला. त्यामुळे नदीच्या पाणी पातळीत वाढ होणार आहे. मण्णूरजवळचे पंपिंग स्टेशन पाण्याखाली जाऊ नये यासाठी दक्षता घेण्यासाठी एल अँड टी कंपनीचे पथक सज्ज असून, बुधवारी भेट देऊन पाहणी करण्यात आली.