बेळगाव : राज्य सरकारने सुरु केलेली मोफत बस पास सुविधा विद्यार्थ्यांची डोकेदुखी वाढवत आहे. बस पाससाठी विद्यार्थी शाळा, कॉलेज सोडून बस स्थानक, बेळगाव वन आणि कर्नाटक वनमध्ये रांगा लावून गर्दी करत आहेत. मात्र ओटीपी वेळेत मिळत नसल्याने त्यांना बसपासशिवाय परतावे लागत आहे. परिणामी अजूनही बसपासविनाच विद्यार्थ्यांना प्रवास करावा लागत आहे.
पाससाठी अर्ज भरताना बहुतेक मुलांनी वडिलांचा मोबाईल क्रमांक दिला आहे. ओटीपीशिवाय बस पासचे स्मार्ट कार्ड मिळत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांची कोंडी होत आहे. तासन्तास रांगेत थांबून ओटीपी वेळेत न मिळाल्याने ओटीपी भरण्याची संधी वाया जात आहे. त्यामुळे विद्यार्थी हताश होऊन घरी परतत हेत. प्राथमिक आणि माध्यमिक शाळा २९ मेपासून सुरू झाल्या. तर महाविद्यालये १५ जूनपासून सुरू झाली आहेत. मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी सत्तासूत्रे घेताच पहिला घोषणा केली ती सर्व विद्यार्थ्यांना मोफत बसपास देण्याची. मात्र विद्यार्थ्यांना आता २५ दिवस उलटूनही पास मिळालेले नाहीत.
सिंधू अॅपवर पाससाठी अर्ज भरावा लागतो. खासगी सायबर कॅफेत जाऊन विद्यार्थ्यांनी अर्ज भरले. त्यासाठी १०० ते १५० रूपयेही दिला. तर काही व विद्यार्थी बेळगाव वन आणि कर्नाटक वन केंद्रांमध्ये अर्ज भरत आहेत. तिथे अर्ज भरणा सुविधा मोफत आहे.
अर्ज भरल्यानंतर आठ दिवसांनी विद्यार्थ्यानी बस पास स्वीकारला पाहिजे. त्यासाठी जो मोबाईल क्रमांक अर्जात भरलेला असेल, तो सोबत मोबाईल असण्याची गरज आहे. पण बहुतांशी विद्यार्थ्यांनी वडिलांचा मोबाईल क्रमांक दिलेला आहे. अन् ओटीपी त्या क्रमांकावर जात असल्याने बस पास स्वीकारताना जो ओटीपी द्यावा लागतो, तो ओटीपी वेळेत उपलब्ध होईनासा झाला आहे. विशेषतः ग्रामीण भागातील मुलांना रेंजची अडचण जाणवत आहे. परिणामी बहुतांशी विद्यार्थ्यांकडे अजूनही बसपास नाही. मुलांना ३१ मार्च २०२७ पर्यंत बस पास दिला जात आहे.