बेळगाव : महापालिकेने बेळगाव हा कर्नाटकचा अविभाज्य भाग आहे, असा ठराव तातडीने मंजूर करावा. तसे न झाल्यास महापालिका बरखास्त करण्याची शिफारस नगरविकास मंत्री डॉ. यतींद्र यांच्याकडे करणार असल्याची वटवट कन्नड संघटनांचा म्होरक्या वाटाळ नागराज यांनी बुधवारी (दि. ५) पत्रकार परिषदेत केली.
चार महिन्यांपासून कन्नड संघटना सातत्याने आंदोलन करत आहेत. मात्र, महापालिकेकडून अद्यापही बेळगाव कर्नाटकचा अविभाज्य भाग आहे, असा ठराव मंजूर करण्यात आलेला नाही. महापालिकेने आपली भूमिका स्पष्ट करावी. ठराव मंजूर करण्यात आणखी विलंब झाल्यास महापालिका बरखास्त करण्याची मागणी नगरविकास मंत्र्यांकडे करणार आहे. कावेरी नदीच्या पाणीवाटपाला विरोध, महादायी योजनेची तातडीने अंमलबजावणी आणि राज्याच्या विविध प्रलंबित प्रश्नांसाठी १३ ऑगस्ट रोजी कर्नाटक बंदची हाक देण्यात आल्याची घोषणाही त्यांनी केली.
म्होरक्या वाटाळ नागराज यांनी पुन्हा म. ए. समितीच्या नावाने शिमगा केला. समितीवर सरकारने बंदी घालावी, अशी मागणी करत त्यांनी सीमाभागातील विकासाला गती देणे, कन्नड भाषिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे आणि कन्नड माध्यमाच्या शाळांना प्रोत्साहन देण्याची गरज असल्याचेही म्हणाले.