बेळगाव : शहरातील विविध भागांतील कचरा येळळूर मुख्य रस्त्यावर टाकला जात असल्याने परिसरात दुर्गंधी पसरली असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. महापालिकेने शहरातील ब्लॅक स्पॉट हटवून कचरा टाकणाऱ्यांवर दंडाची तरतूद केली आहे. तसेच अनेक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविल्यामुळे काही नागरिक व हॉटेल व्यावसायिक शहरात कचरा टाकण्याऐवजी येळळूर रोडवर आणून तो टाकत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.
या प्रकारामुळे येळळूर मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणात कचऱ्याचे ढीग साचत असून परिसरात अस्वच्छता वाढली आहे. दुर्गंधीमुळे नागरिकांना रस्त्यावरून ये-जा करताना त्रास सहन करावा लागत आहे. तसेच भटक्या कुत्र्यांचा वावर वाढल्याने अपघात व होण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे. स्थानिकांनी प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करूनही ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप केला आहे. संबंधित ठिकाणी कचरा टाकणे व त्याचे वर्गीकरण करण्याचे काम तातडीने बंद करण्यात यावे, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
शहर स्वच्छ ठेवण्यासाठी नियम असतील तर त्यांची अंमलबजावणी सर्वत्र झाली पाहिजे, अशी भावना नागरिकांनी व्यक्त केली. महापालिकेने या प्रकाराची तातडीने दखल घेऊन कचरा टाकणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी. अन्यथा येळळूर रोडवरील साचलेला कचरा महानगरपालिकेच्या कार्यालयासमोर आणून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा स्थानिकांनी दिला आहे.